गांधीजींनी उंचविला स्त्रियांचा सामाजिक दर्जा
कलकत्ता, ता. 30 – भारतीय स्त्रियांच्या स्वार्थ त्यागाबद्दल त्यांना धन्यवाद देणारे उद्गार लॉरेना बीहन्ह या महिलेने हावरा येथील एका सभेत बोलताना काढले. राष्ट्रसंघाच्या अध्यक्षपदाचा मान मिळविणारी जगातील पहिली स्त्री म्हणूनही त्यांनी श्रीमती विजयालक्ष्मी पंडित यांचे कौतुक केले.
राष्ट्रसंघाने जगातील महिलांच्या सामाजिक दर्जासंबंधी चौकशी करण्यासाठी नेमलेल्या समितीच्या लॉरेना बीहन्ह सभासद आहेत. भारतीय स्त्रिया समंजस, स्वतंत्र झाल्या म्हणजे मग त्यांच्या त्यागानेच भारत स्वतंत्र होईल, असे म. गांधी म्हणत असत. या विधानाने भारतीय स्त्रियांचा दर्जा शतपटीने वाढला, असे लॉरेना आपल्या भाषणात म्हणाल्या.
नऊ देशातील सरकारांनी आपल्या कायद्यात सुधारणा करून स्त्रियांना सामाजिक स्थान प्राप्त करून दिले, ते राष्ट्रसंघाच्या प्रयत्नामुळेच होय, असे त्या म्हणाल्या. पंधरा देशात पुरूषांच्या बरोबरीने स्त्रियांना पगार देण्यात येऊ लागला, असेही लॉरेना यांनी यावेळी भाषणात सांगितले.
धर्मानेच जगात शांतता निर्माण होईल
सेंट लुइस – गेल्या आठवड्यांत वॉशिग्टन विद्यापीठातील एका सभेत बोलताना भारताचे उपाध्यक्ष डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन म्हणाले की, जगात शांतता निर्माण करण्यासाठी धर्माचा उपयोग होऊ शकेल. धर्म जर अपरिवर्तनवादी भूमिकेला चिकटून राहील तर आजच्या काळाचे आव्हान ते स्वीकारू शकणार नाही.
धर्माने विज्ञानाशी विरोध करता कामा नये. धर्माने बुद्धी व भावना यांचा समन्वय केला पाहिजे. मानवतावादी दृष्टीने धर्माला समाजविरोधी स्वरूप येता कामा नये. विज्ञान हा आंतरराष्ट्रीय सलोख्याचा पाया आहे असे कम्युनिस्टांचे म्हणणे आहे. या उलट जगात ऐक्य प्रस्थापित करण्यासाठी धर्मांचाच उपयोग होईल हे लोकशाहीने सिद्ध करून दाखविले पाहिजे.
दुसऱ्या महायुद्धानंतर आशियाला महत्त्व आले आहे. आशियातील सार्वत्रिक हलाखी आणि आशियाई लोकांची आत्मसंरक्षणाची तळमळ हा एक मोठा बिकट प्रश्न आहे. रणांगणावर कम्युनिझमचा पराभव केला म्हणजे तेवढ्याने लोकांच्या अंतकरणातील कम्युनिझमवर विजय मिळविला असे होत नाही.