-माधव विद्वांस
चित्रपट व नाट्य अभिनेत्री तसेच निर्मात्या, दिग्दर्शक सुमती गुप्ते जोगळेकर यांचे आज पुण्यस्मरण. त्यांचा जन्म सातारा जिल्ह्यातील वाई येथे 11 मे 1919 रोजी झाला. त्यांचे वडील बडोदा न्यायाधीश असल्याने बालपण व शिक्षण बडोदा येथेच पार पडले. त्यांना अभिनयाची आवड असल्याने पदवी परीक्षा पास झाल्यावर त्यांनी प्रभात फिल्म कंपनीत प्रवेश केला.
त्यावेळी चित्रपटांत काम करण्यास स्त्रियांना परवानगी मिळणे अवघड होते. पण सॉलिसीटर लाड यांची व सुमतीबाई यांच्या वडिलांची खास मैत्री होती. लाड यांची कन्या दुर्गाबाई खोटे प्रभात फिल्ममध्ये काम करीत होत्या. त्यामुळे त्यांना या क्षेत्रात येण्यासाठी फारसा विरोध झाला नाही.
त्यांनी धाडस करून घरीच काढलेला स्वतःचा एक लहानसा फोटो व त्यासोबत स्वतःची माहिती लिहून थेट व्ही. शांताराम यांना प्रभात फिल्म कंपनीच्या पत्त्यावर पाठवून दिले आणि एके दिवशी प्रभात फिल्म कंपनीकडून त्यांना बोलावण्याचे पत्र आले. त्यावेळी व्ही. शांताराम यांनी त्यांची चाचणी घेतली. वर्ष 1940 मध्ये सुमतीबाईंना “संत ज्ञानेश्वर’ चित्रपटात पहिली संधी मिळाली. या चित्रपटात ज्ञानेश्वरांवर मूक प्रेम करणाऱ्या नर्मदेचे काम त्यांना देण्यात आले.
ज्ञानेश्वर महाराज नदीत स्नान करून परतताना उमटलेल्या त्यांच्या ओल्या पायाच्या ठशांवर हाताच्या ओंजळीतून फुले वाहणे एवढेच त्यांना काम होते. “फोटोजेनिक चेहरा असणारी एकमेव मराठी अभिनेत्री’, असा बाबूराव पटेलांसारख्या दिग्दर्शकाकडून त्यांना अभिप्राय मिळाला. प्रभात फिल्म कंपनीतले त्यांचे हे एकमेव काम.
सरस्वती सिनेटोनचे दादासाहेब तोरणे यांनी सुमती यांना “नवरदेव’ चित्रपटात नायिकेची भूमिका दिली होती. वर्ष 1941 मध्ये “नवरदेव’ प्रदर्शित झाला. आचार्य अत्रेंनी सुमतीबाईंना नाट्यक्षेत्राकडे आणले. त्यांच्या “लग्नाची बेडी’ या नाटकात सुमतीबाईंनी त्या भूमिकेचे अक्षरशः सोने केले. तसेच “संशय कल्लोळ’ मधील कृतीकाही त्यांनी ठसक्याने रंगविली.
वर्ष 1941 मध्ये भालजी पेंढारकर आणि शिराज अली हकीम यांच्या फेमस अरुण चित्र या कंपनीचा “थोरातांची कमळा’ या चित्रपटामध्ये कमळाची भूमिका केली. त्यानंतर याच कंपनीच्या “सूनबाई’ चित्रपटात त्यांनी आधुनिक तरुणीची भूमिका पार पाडली. त्यानंतर “चिमुकला संसार’ (1943), “गजाभाऊ’ (1944) या चित्रपटांत काम मिळाले. चित्रपटाचे काम सुरू होते. त्यांचे दिग्दर्शन वसंत जोगळेकर करीत होते. येथे त्यांची ओळख होऊन दोघांनी विवाह केला. त्यांना मीरा, चंदा व मधुश्री अशा 3 मुली झाल्या.
वर्ष 1945 मध्ये सुमती गुप्तेंना प्रकाश पिक्चर्स, वाडिया मुव्हीटोन आणि जनक चित्र अशा मोठ्या चित्रसंस्थांमध्ये कामासाठी संधी मिळाली व हिंदी सिनेमात त्यांचे पदार्पण झाले. “हमारा संसार’, “शरबती आँखे’ व “संतान’ यापैकी पहिल्या दोन चित्रपटांत त्यांनी सहनायिकेची भूमिका केली.
“संतान’ चित्रपटात त्यांनी नायिकेची भूमिका केली होती. त्यानंतर सुमती यांनी वसंत जोगळेकरांबरोबर “मीरा चित्र’ ही संस्था स्थापन केली.मीरा चित्रमार्फत “साखरपुडा’ (1949), हा पहिला चित्रपट काढला.
अभिनेत्री म्हणून सुमतीबाईंनी नाव कमविले तसेच एक माणूस म्हणूनही त्या महान होत्या. 31 आक्टोबर 2009 रोजी त्यांचे निधन झाले.