वाटाघाटीनंतर मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र निर्माण होईल
पुणे, ता. 4 – संबंधित पक्षांशी चाललेल्या वाटाघाटीनंतर मुंबई शहर राजधानी असलेला संयुक्त महाराष्ट्र निर्माण होईल असा विश्वास आज महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेस कमिटीचे अध्यक्ष श्री. मामासाहेब देवगिरी यांनी व्यक्त केला. श्री. देवगिरीकर म्हणाले की, कमिशनची द्विभाषिक राज्याची शिफारस महाराष्ट्र कदापिही मान्य करणार नाही कारण ती मराठी भाषिकांवरील गैर विश्वासावर आधारलेली आहे आणि त्या योजनेत गुजराथी आणि मराठी भाषिकांमध्ये कायम असंतोष धुमसत राहावा अशी बीजे पेरून ठेवण्यात आलेली आहे.
मुंबई शहराचा संयुक्त महाराष्ट्रात समावेश करण्यास विरोध करणाऱ्यांना श्री. देवगिरीकर यांनी असे आवाहन केले की, त्यांना याबाबतीत कोणत्या शंका त्यांच्या मनात येतात त्या त्यांनी स्पष्टपणे पुढे मांडाव्यात म्हणजे महाराष्ट्राचे नेते त्यांचा विचार करू शकतील व त्यांच्या समाधानासाठी आणखी काय करावयास हवे आहे याची त्यांना कल्पना बांधता येईल.
विदर्भाबाबत बोलताना श्री. देवगिरीकर म्हणाले की, आज ना उद्या विदर्भ संयुक्त महाराष्ट्रात येईल याबद्दल मला तरी शंका वाटत नाही. पण प्रथम आपण मुंबई शहराचा प्रश्न सोडविल्यावर या प्रश्नावर लक्ष केंद्रित केले पाहिजे. संयुक्त महाराष्ट्राने सुचविलेली विदर्भासह संयुक्त राज्याची योजना कॉंग्रेसने स्वीकारावी अशा आशयाचा ठराव या सभेत संमत करण्यात आला.
जंगलचा राजा पंडितजींना सामोरा आला
जुनागड – पस्तीस कोटी जनतेच्या हृदय सिंहासनावर अधिराज्य गाजविणाऱ्या पं. नेहरूंच्या जणू दर्शनार्थच काल सकाळी जंगलचा राजाही सपत्निक सामोरा आला होता. पंडितजींनी काल सकाळी गीर जंगलात संचार केला. तेथे डझनभर तरी सिंह त्यांना दिसले असावेत. स्वतःपुढील भक्ष्यावर येथेच्छ ताव मारण्यात गढून गेलेला एक दहा फुटी सिंह पाहून तर पंडितजींना खूपच मजा वाटली.
परंतु खरी गंमत पुढेच होती. पंडितजी आपल्या बरोबरीच्या मंडळींसह परत यावयास निघाले तेव्हा सिंह-सिंहणीची एक जोडी मोठ्या डौलाने पावले टाकत सामोरी येत असलेली त्यांना दिसली. जणू पस्तीस कोटी जनतेच्या हृदयसिंहासनावर प्रेमाचे अधिराज्य गाजविणाऱ्या पंडितजींचे सुप्रभाती दर्शन घ्यावे म्हणूनच हा जंगलाचा राजा आपल्या पत्नीसह गुहेबाहेर पडला होता.