-माधव विद्वांस
गीतकार, संगीतकार आणि गायक तसेच चित्रपट निर्माते म्हणून प्रसिद्ध असलेले भारतरत्न भूपेन हजारिका यांचा आज स्मृतीदिन. त्यांचा जन्म 8 सप्टेंबर 1926 ला आसाममधील तिनसुकिया जिल्ह्यातील सदिया या गावात झाला.
त्यांच्या वडिलांचे नाव नीलकंठ आणि आईचे नाव शांतीप्रिया. त्यांना दहा मुले झाली त्यातील ते सर्वात मोठे होते. त्यांचे धाकटेभाऊ जयंत हे पण गीतकार, संगीतकार होते. त्यांच्या आईकडून त्यांना गायनाची प्रेरणा मिळाली. त्यांचे प्राथमिक शिक्षण व बालपण गुवाहाटीमध्ये ब्रह्मपुत्रेच्या परिसरातच पार पडले. वयाच्या दहाव्या वर्षांपासूनच ते आसामी भाषेत गाणी गात असत.
चित्रपट निर्माते ज्योतिप्रसाद अग्रवाल यांनी त्यांचा आवाज ऐकला व त्यांना तो खूप आवडला. ज्योतिप्रसाद यांच्या “इंद्रमालती’ या चित्रपटात हजारिकांनी दोन गाणी गायली. वयाच्या अवघ्या 13 व्या वर्षी त्यांनी पहिले गाणे लिहिले. येथूनच गायक, संगीतकार आणि गीतकार होण्याचा त्यांचा प्रवास सुरू झाला. त्यांनी गुवाहाटी येथील सोनाराम हायस्कूल व धुबरी शासकीय हायस्कूल मध्ये शिक्षण घेतले आणि ते वर्ष 1940 मध्ये तेजपूर हायस्कूलमधून मॅट्रिक झाले. त्यांनी कॉटन कॉलेजात वर्ष 1944 मध्ये बीए (पॉलिटिक्स) पदवी घेतली. वर्ष 1946 मध्ये बनारस हिंदू विद्यापीठातून एमए झाले. त्यानंतर हजारिका गुवाहाटीतील ऑल इंडिया रेडिओमध्ये हजर झाले. तेथे ते बंगाली गाण्यांचे हिंदी भाषांतर करून गायचे. हजारिकांना बऱ्याच भाषा अवगत होत्या.
ऑल इंडिया रेडिओवर काम करीत असतानाच त्यांनी कोलंबिया विद्यापीठाची शिष्यवृत्ती मिळाली व ते वर्ष 1949 मध्ये अमेरिकेस गेले. तेथे भारताच्या मूलभूत शिक्षणाची तयारी करण्यासाठीच्या प्रबंधात पीएचडी मिळविली. कोलंबिया विद्यापीठातच प्रियंवदा पटेल यांची भेट झाली. प्रियंवदा या केनियात व्यवसाय करणाऱ्या कटुंबातील होत्या. त्यांचे अमेरिकेत 1950 मध्ये लग्न झाले. त्यांना एक मुलगा झाला, त्याचे नाव तेज. वर्ष 1953 मध्ये हजारिका आपल्या कुटुंबासमवेत भारतात परतले. भारतात आल्यावर त्यांनी गुवाहाटी विद्यापीठात शिक्षक म्हणून काम केले तसेच “इंडियन पीपल्स थिएटर असोसिएशन’ (इप्टा) या डाव्या विचारसरणीच्या नाट्यकला-क्षेत्राकडे ओढले गेले. 1955 मध्ये गुवाहाटीत भरलेल्या इप्टाच्या तिसऱ्या अखिल आसाम परिषदेच्या स्वागत समितीचे ते
सचिव होते.
साधारण 1960/62 च्या दरम्यान त्यांची पत्नी त्यांच्यापासून विभक्त झाल्या. त्यानंतर त्यांच्या आयुष्यात चित्रपटसृष्टीतील कल्पना लाजमी आल्या. कल्पना यांनी त्यांना आयुष्याच्या अखेरपर्यंत साथ दिली. त्यांनी आपल्या संपत्तीमधील मोठा हिस्सा कल्पना लाजमींच्या नावावर केला. त्या दोघांनी मिळून “एक पल’, “रुदाली’, “दरम्यान (इन बिटवीन)’, आणि “क्यों?’ या बंगाली-हिंदी चित्रपटांची निर्मिती केली. सई परांजपेंचे “पपीहा’, “साक्ष’, “मिल गयी मंझिल मुझे’ आणि एम. एफ. हुसेन यांच्या “गजगामिनी’ या चित्रपटांच्या निर्मितीतही त्यांचा मोठा सहभाग होता. सुमारे एक हजार भावगीते, लघुकथा, निबंध, कविता, प्रवासवर्णने, बालगीते त्यांनी लिहिली.
त्यांच्या लेखनाला आसामच्या ब्रह्मपुत्रेच्या व लोकसंस्कृतीची पार्श्वभूमी होती. त्यांच्या गीतांचे बंगाली आणि हिंदी भाषांत अनुवाद व ध्वनिमुद्रण झाले आहे. त्यांची आसाम विधानसभेवर निवड झाली होती. 2004 मध्ये त्यांनी लोकसभा निवडणूक लढविली होती; पण ते पराभूत झाले होते. त्यांना पद्मभूषण, भारतरत्न यासह अनेक पुरस्कार मिळाले. 5 नोव्हेंबर 2011 रोजी मुंबई येथे त्यांचे निधन झाले. अभिवादन.