आता लढा अटळ आहे! भाई बागल यांचे उद्गार
कोल्हापूर, ता. 10 – आता लढा अटळ आहे, असे उद्गार महाराष्ट्रीय नेते श्री. माधवरावजी बागल यांनी कॉंग्रेसच्या ठरावावर बोलताना यूपीआयच्या प्रतिनिधीजवळ काढले. ते म्हणाले, श्री. शंकरराव देवांनी नेतृत्व घेतले नाही तर ते डाव्या पुढाऱ्याकडे जाईल. महाराष्ट्राचे तुकडे करणारा कॉंग्रेसचा निर्णय महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेसने स्वीकारला तर महाराष्ट्रात कॉंग्रेस अस्तित्वात राहणार नाही. मुंबईशिवाय महाराष्ट्र आर्थिकदृष्ट्या समर्थ होऊ शकत नाही. लोकांना निराशा वाटत असली तरी त्यांना झगडा नको आहे, पण तो अटळ होत आहे.
अहमदनगरच्या किल्ल्यावर उपयुक्त स्मारक बांधा
अहमदनगर – भारताच्या स्वातंत्र्य इतिहासातही महत्त्वाचे स्थान प्राप्त झालेल्या अहमदनगरच्या सुप्रसिद्ध किल्ल्यावर योग्य असे स्मारक बांधले जावे असे राष्ट्रपती राजेंद्रप्रसाद यांनी येथे बोलताना सुचविले. “चले जाव’ चळवळीतील पंडित नेहरूंसह बहुतेक महान नेत्यांना ब्रिटीश सरकारने याच किल्ल्यात डांबून ठेवले होते. तेव्हा या किल्ल्यावर उपयुक्त आणि लोककल्याणकारी असे स्मारक उभारावे असे राष्ट्रपतींनी आग्रहाने प्रतिपादन केले. अहमदनगर जिल्ह्यातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांनी केलेल्या स्वागत समारंभात भाषण करताना त्यांनी ही सूचना केली. राष्ट्रपतींनी आज अहमदनगरच्या किल्ल्यास भेट दिली. बेचाळीसच्या आंदोलनात या किल्ल्यावरील ज्या खोल्यातून भारतीय नेत्यांना स्थानबद्ध करून ठेवले होते त्या त्यांनी पाहिल्या.
पाकिस्तानात जातिभेद राहूच शकत नाही
कराची – “”पाकिस्तानच्या निर्मितीबरोबर जातीभेद आणि वंशभेद नष्ट झाले पाहिजे व सर्वांना समान संधी मिळाली पाहिजे. जे आपल्या बरोबर राहिले आहेत त्यांना आपण आपलेच मानले पाहिजे.” असे विचार पश्चिम पाकिस्तानचे मुख्यमंत्री डॉ. खानसाहेब यांनी “स्वतंत्र मतदार संघा’बाबतचे आपले मत व्यक्त करताना काढले.
स्वतंत्र तेलंगण निर्मिती झालीच पाहिजे
हैदराबाद – समाजवादी पक्षाच्या नेतृत्वाखालील हैदराबाद मजदूरसंघाने स्वतंत्र तेलंगणाच्या निर्मितीची मागणी साकार करण्याच्या मागे उभे राहतील, असा इशारा दिला आहे.