-शर्मिला जगताप
आज राष्ट्रीय शिक्षण दिन. स्वतंत्र भारताचे पहिले शिक्षणमंत्री मौलाना अबुल कलाम आझाद यांचा 11 नोव्हेंबर हा जन्मदिन “राष्ट्रीय शिक्षण दिन’ म्हणून दरवर्षी साजरा होतो.
मौलाना आझाद यांचा जन्म 11 नोव्हेंबर 1888 रोजी सौदी अरेबिया या देशातील पवित्र भूमी मक्का येथे झाला. त्यांचे वडील मौलाना खैरुद्दीन हे धर्मगुरू होते. मौलाना खैरुद्दीन आपल्या कुटुंबासह भारतात आले आणि त्यांनी कलकत्ता (कोलकाता) शहरात वास्तव्य केले. मौलाना आझाद यांचे मूळ नाव मोहिउद्दीन अहमद. अबुल कलाम (वाचस्पती) ही त्यांची पदवी होती. अनेक वृत्तपत्रांतून “आझाद’ ह्या टोपणनावाने ते लेखन करीत. फार्सी, उर्दू व अरबी या भाषांवर त्यांचे प्रभूत्व होते. त्याचबरोबर इस्लाम धर्म, तर्कशास्त्र, गणित व तत्त्वज्ञान या विषयांचाही त्यांनी अभ्यास केला.
सर सय्यद अहमदखान यांचा त्यांच्यावर प्रभाव होता. 1908 मध्ये इजिप्त, अरबस्तान, तुर्कस्तान, फ्रान्स इ. देशांना त्यांनी भेटी दिल्या. तेथील क्रांतिकारकांच्या संपर्कामुळे त्यांची राजकीय मते बदलू लागली आणि कलकत्त्यास परत येताच हिंदी मुस्लिमांनी स्वातंत्र्यसंग्रामात पुढाकार घ्यावा, असे त्यांचे मत होते. 1912 साली त्यांनी कलकत्ता येथे “अल्-हिलाल’ हे उर्दू साप्ताहिक सुरू केले. 1915 साली त्यांनी “अल्-बलाघ’ हे दुसरे वृत्तपत्र काढले. या दरम्यान त्यांना अटकही झाली. 1920 साली सुटका झाल्यावर ते “असहकार चळवळीत’ सामील झाले. पुन्हा त्यांना एक वर्ष अटकेत राहावे लागले.
1923 साली दिल्ली येथे झालेल्या कॉंग्रेसच्या विशेष अधिवेशनाचे ते अध्यक्ष होते. 1930 मध्ये त्यांना पुन्हा अटक झाली. मुस्लीम समाजास सत्याग्रहात सामील करून घेण्याचे मुख्य कार्य त्यांनी केले. 1942 च्या “चले जाव आंदोलना’च्या वेळी त्यांना पुन्हा अटक झाली. 1945 साली त्यांची सुटका झाली.
1942 ची क्रिप्स योजना, 1945 ची वेव्हेलची सिमला परिषद व 1946 मधील ब्रिटिश मंत्र्यांचे शिष्टमंडळ या प्रसंगी वाटाघाटींत त्यांनी पुढाकार घेतला. ते 1939 ते 1946 पर्यंत कॉंग्रेसचे अध्यक्ष होते. 1947 साली भारताला स्वातंत्र्य मिळाले. पं. जवाहरलाल नेहरूंनी मौलानांकडे शिक्षण मंत्रालयाचे काम सोपवले व ते स्वतंत्र भारताचे पहिले शिक्षणमंत्री झाले. त्यांनी त्या काळी अत्यंत बिकट परिस्थितीतही भारतात शिक्षणाचा प्रसार व प्रचार उत्तम प्रकारे केला.
“तजकेरा’, “गुब्बारे खातिर’, “कौले फैसल’, “दास्ताने करबला’, “तरजुमानुल कोरान’ ही उर्दू भाषेत पुस्तके लिहिली. तरजुमानुल कोरान म्हणजे कुराणचा उर्दू अनुवाद. “इंडिया विन्स फ्रीडम’ (1959) हे त्यांचे आत्मचरित्र त्यांच्या मृत्यूनंतर प्रसिद्ध झाले आहे. हैदराबाद येथे मौलाना आझाद मुक्त विद्यापीठ उभारण्यात आले आहे. भारत सरकारने 1992 मध्ये त्यांना मरणोत्तर “भारतरत्न’ किताब प्रदान केला.