जनतेसाठी घटना आहे, घटनेसाठी जनता नव्हे
गांधीनगर, दि. 10 – राज्यघटना ही जनतेसाठी आहे. जनता राज्यघटनेसाठी नाही, हे आपण कधीही विसरता कामा नये, असे उद्गार राज्यपाल के. के. विश्वनाथन यांनी आज विधानसभेच्या इमारतीत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या तैलचित्राचे अनावरण करताना काढले. काळाप्रमाणे बदलत्या गरजेनुसार बदल होण्याची क्षमता घटनेत असली पाहिजे.
मुंबई-नाशिक थेट दूरध्वनी सेवा
मुंबई – मुंबई ते नाशिकदरम्यान थेट टेलिफोन दळणवळण लाइनचे मुख्यमंत्री चव्हाण यांचे हस्ते उद्घाटन झाले.
हुंड्याविरुद्ध लोकमत तयार करण्याची जरुरी
नवी दिल्ली – लोकसभेत एका पुरवणी प्रश्नाला उत्तर देताना पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी सांगितले की, हुंड्याच्या प्रथेविरुद्ध लोकमत तयार करण्याची जरुरी आहे. हुंडाबंदीचा नियम सरकारी कर्मचारी पाळतात की नाही हे पाहण्यासाठी सरकारला संसद सदस्यांच्या व इतरांच्या साहाय्याची जरुरी आहे.
हा नियम आपल्या परिसरात पाळला जातो की नाही, हे त्यांनी पाहिले पाहिजे. यासाठी लोकांच्या पाठिंब्याचीही जरुरी आहे. लोकांनीही समजूतदारपणा दाखवून हुंडा देणे व घेणे टाळले पाहिजे, असेही इंदिरा गांधी म्हणाल्या.