गरिबांचा उद्धार हेच हुतात्म्यांचे खरे स्मारक
मुंबई, दि. 2 – पददलित आणि गरीब यांच्या उद्धारासाठी प्रयत्न करा, असे आवाहन परराष्ट्रमंत्री यशवंतराव चव्हाण व मुख्यमंत्री शंकरराव चव्हाण यांनी केले. चव्हाण म्हणाले, गरिबांना न्याय देणे हीच स्वातंत्र्यात हौतात्म्य पत्करल्याचे स्मारक उभारणे होय.
भाई कोतवाल यांना हौतात्म्य प्राप्त होण्याच्या आधी तीन आठवडे भाई कोतवाल यांची व माझी मुंबईत भेट झाली होती, ती एकच भेट. ध्येयवादी व निर्धारित असे ते असल्याचे तेव्हाच माझ्या लक्षात आले. स्वातंत्र्य सैनिकांनी स्वातंत्र्यासाठी मोठा त्याग केला. कारण त्यांना नवा भारत बनवायचा होता.
दुर्बल घटकाला स्वतःच्या पायावर उभे केले पाहिजे
कोपरगाव – गरीब, उपेक्षित माणसांची आर्थिक अडचण दूर करून त्याला स्वतःच्या पायावर उभे करण्याची महत्त्वाची गरज आहे. नव्या आर्थिक कार्यक्रमाद्वारे गरिबांचे कल्याण साधण्याचा निर्धारच केला आहे, असे मंत्री रत्नाप्पा कुंभार म्हणाले.
बॅंकेतील पैसे सार्वजनिक मालकीचे असतात त्याचा वापर सामाजिक हितासाठी करून देशाची आर्थिक प्रगती साधावयाची असते. गरीब माणसाला पत नाही म्हणून त्याला पैसा नाकारणे योग्य नव्हे. गरीब माणूस हा विकासाचा केंद्रबिंदू मानून त्याला त्याची गरिबी दूर करण्यासाठी आर्थिक मदत देण्याचा कार्यक्रम सुरू आहे.