एका सत्संगात प्रपंच्याची आणि परमार्थाची सांगड कशी घालायची याचं मार्गदर्शन करताना पू. योगी ज्ञाननाथजी हे आपल्या भक्तभाविक उपासकांना म्हणाले, “”आज मी तुम्हाला म्हातारपणातली एक सुखाची गुरूकिल्ली देणार आहे. ती जपून ठेवा.” ती गुरूकिल्ली म्हणजे आता तुम्ही जसे नोकरी-चाकरीतून काम धंद्यातून निवृत्त झालात ना? तसेच तुम्ही तुमच्या संसार प्रपंच्यातूनही निवृत्त व्हा. निवृत्त व्हा म्हणजे घरदार सोडा, असं नाही तर आता एक करा ती जी मी सुखाची किल्ली म्हणतो ना ती हातात घ्या.
आता तुम्ही काय करा, तुम्ही तुमच्याच घरात आणि घरातल्या लोकांच्यावर लक्ष द्या, लक्ष ठेवा. पण तुम्ही त्यांच्या जगण्यात, संसार, प्रपंच्यात लक्ष घालू नका. बरं हे काही मी एकटाच सांगतोय असे नाही, तर प्रापंचिक साधूसंतांनी आणि सत्पुरुषांनीही तेच सांगितले आहे.
पू. गोंदवलेकर महाराजांनी त्यांच्या एका भक्तास हीच सुखाची गुरूकिल्ली पत्रात लिहून कळवली होती. त्यांचे शब्द हे फारतर थोडे वेगळे असतील. आशय मात्र एकच आहे. त्यांनी त्या गृहस्थांना पत्रात लिहिले होते की, प्रपंच्यात वृद्धपणी फारसे न पाहावे। मुलांस मार्ग दाखवून आपण सुखी रहावे।।
म्हणजे काय तर तुम्ही तुमच्या मुलाबाळांचे पालन पोषण केलेत. त्यांना शिकविलेत, शहाणे केलेत. त्यांचा संसार प्रपंच त्यांना थाटून दिलात ना. मग झाले तर आता तुम्ही काय करा, तुम्ही त्यांच्यावर फक्त दुरून लक्ष ठेवा. जर त्याचं कुठे काही चुकत असेल. त्याच्या हातून कळत नकळत काही गैरवर्तन घडत असेल तर त्यांना समजावून सांगा. गोड शब्दांत तुम्हाला काय म्हणायचं सांगायचं आहे ते सांगा. आता त्यांनी तसंच करायला वागायला हवं, असा हट्ट, हेका धरू नका. कारण, हे विसरू नका की हा दोन पिढ्यांतला फरक असतो.
आपण तरुण असताना याच चाकोरीतून गेलेलो असतो. मुलाला, सुनेला, लेकीला, जावयाला जिथे तुमचे मार्गदर्शन हवे असेल तिथेच आणि त्यांनी ते मागितले तरच द्या. आपलाच हेका मग तो पुरूषांनी मुलांच्या किंवा सासवांनी सुनेच्या संसारात चालवू नका.