मोहन एस. मते
दडी मारलेला मान्सून जुलैचा मध्य आला तरी बरसलेला नाही. परिणामी, कृषीग्रामीण अर्थव्यवस्थेसह एकंदरितच अर्थचक्र चिंतेत सापडले आहे
वेधशाळेने किंवा हवामान विभागाने 4 महिन्यांपूर्वी प्रसारित केलेल्या अंदाजानुसार यंदा मान्सूनचे आगमन झाले; पण तो नेहमीपेक्षा जास्त प्रमाणात बरसेल, असा फार मोठा दिलासा देणारा अंदाजही हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला होता. त्या अंदाजानुसार आवश्यक एवढा पाऊस झालेला नाही. राज्यातील रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर अशा काही जिल्ह्यांतच जून महिन्यात पाऊस झाला आहे; परंतु उर्वरित अनेक जिल्ह्यांत पावसाने पाठ फिरवल्यामुळे शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट ओढावले आहे.
साधारणपणे राज्यात 7 जूननंतर पावसाचे आगमन होते. मृग नक्षत्राचा पाऊस कोसळायला सुरुवात होते. यादरम्यान शेतीची कामेही सुरू होतात. त्यापूर्वी काही भागांमध्ये रोहिणी नक्षत्राचा शिडकाव येऊन जातो. रोहिणी नक्षत्राचा पाऊस जर बऱ्यापैकी झाला असेल तर शेतकऱ्यांच्या पेरण्यांच्या कामाला वेग येतो; परंतु अलीकडील काळात पावसाच्या ठरलेल्या ऋतुमानाचे जे काही कर्तव्यचक्र आहे ते कोलमडल्याचे दिसत आहे.
जून ते सप्टेंबरपर्यंत या काळात पडणारा पाऊस हा संपूर्ण वर्षाच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडवत असतो. वेळेत येणारा पाऊस, पावसाची हजेरी ही संपूर्ण वर्षभरासाठीच्या अनेक प्रकारच्या कामांसाठीची शिदोरी असते. अन्न, धान्य उत्पादन आणि महत्त्वाचे म्हणजे पिण्याच्या पाण्याचा प्रश्न यावर विसंबून असतो. पाऊस जर पुरेसा आणि योग्य वेळी बरसला नाही तर पाण्याचे भीषण संकट निर्माण होते. भारत हा कृषिप्रधान देश असल्याने शेतीच्या उत्पादनावर या देशाचे अर्थकारणही निर्भर आहे. पाऊस थोडा जरी कमी-जास्त झाला तरी त्याचा परिणाम अगदी शेअरबाजारावरही होतो. रोजगारव्यवसायही त्यामुळे प्रभावित होतात. अशा अनेक अर्थांनी आज राज्यात पावसाने दडी मारल्यामुळे सर्वच जण चिंतेत आहेत. विशेषतः शेतकरी हवालदील झालेला आहे.
करोनासारख्या महामारीच्या काळात शेतीक्षेत्रावर मोठे संकट उभे आहे. पाऊस पडत नसल्याने शेतकऱ्यांमध्ये नैराश्य निर्माण झालेले आहे. राज्याच्या अनेक जिल्ह्यांमध्ये खेड्यापाड्यात, वाडी वस्तीत आतापासून पाण्याची भीषण टंचाई निर्माण झालेली असून शेतीबरोबरच पिण्याचा पाण्याचा प्रश्न निर्माण झालेला आहे. मराठवाडा, विदर्भ, खानदेश, पश्चिम महाराष्ट्रात ऐन जुलै महिन्यात पिण्याच्या पाण्यासाठी महिलांना त्रास सुरू झालेला आहे. दूरवर पाण्याचा शोध घ्यावा लागतो आहे. याबाबत सरकारने आतापासून आवश्यक ती काळजी घेणे गरजेचे आहे.
ज्यांनी पेरण्या केल्या आहेत ती पिके कोमेजू लागली आहेत. या स्थितीत दुबार पेरणीचे संकट दिसत असून शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. मृग आणि आर्द्रा या दोन्हीही नक्षत्रांनी सुुरुवातीलाच घोर निराशा केल्याने जवळपास सर्व खरीप हंगाम संकटात सापडलेला आहे. जळगाव, धुळे, नंदुरबार या जिल्ह्यांमध्ये समाधानकारक पाऊस नसल्याने जवळपास 80 टक्के पेरण्या झालेल्याच नाहीत. या सर्व जिल्ह्यांमध्ये नगदी पीक म्हणून पांढरे सोने (कापूस) पेरणीचे क्षेत्र सर्वाधिक असते.
पावसाचा अंदाज वेधशाळेने व्यक्त केला असला तरी याचा अर्थ पावसाचा भरवसा नाही. ज्या पावसाच्या शुभवर्तमानावर जगण्याचे आश्वासन मिळते त्या जगण्याविषयी आज कोणीच कशाची हमी किंवा खात्री देऊ शकत नाही. अनेक प्रकारच्या इच्छा लोकांच्या मनामध्ये असतात. ज्या जून-जुलै महिन्याच्या काळात अनेक गावच्या नद्या आणि नाले दुथडी भरून वाहतात त्या अनेक नद्यांचे पात्र सध्या कोरडे ठणठणीत असल्याचे पाहून कोणाच्याही मनामध्ये सहजपणे भीती निर्माण होते. कारण या काळात पाण्याची होत असलेली टंचाई जाणवली तर पुढे काय परिस्थिती असेल, असा प्रश्न पडतो.
पाण्याचे दुर्भिक्ष हे केवळ पिण्यापुरते संबधित राहात नाही तर त्याचा अनेक क्षेत्रावर मोठा परिणाम होतो. लक्षात न येणारी परंतु एक ठसठसणारी वेदना म्हणतात तशा प्रकारची अस्वस्थता सामाजिक पातळीवर निर्माण होऊ पाहत आहे. शेतकऱ्यांना पुन्हा एका मोठ्या दुष्टचक्राचा सामना करावा लागतो आहे. विशेषत: कोरडवाहू शेतीसाठी कर्ज घेऊन पीकपाणी केलेल्या शेतकऱ्यांना पुन्हा कर्जबाजारीपणाचाच सामना करावा लागण्याची स्थिती निर्माण झाली आहे.
अन्नधान्याच्या उत्पादनावर त्याचा 100 टक्के परिणाम होऊ शकतो. आजच्या परिस्थितीत भडकलेले इंधनाचे दर, जीवनावश्यक वस्तूंचे खाद्य तेलांचे, डाळीसाळीचे भाव वाढत आहेत. सरकारने महागाई कमी होत असल्याचा दावा केला तरी गेली 2/3 महिन्यांपासून कमी पावसामुळे हीच महागाई पुन्हा उसळी मारून वर येताना दिसत आहे. गेल्या दोन वर्षांपासून आजपर्यंत करोनोची दहशत आहे. करोनाचा प्रभाव असूनही शेतकऱ्यांना, शेतमजुरांना, व्यापाऱ्यांना किंवा अगदी सामान्य नागरिकांना पावसाळाच्या काळातही जी काही आपली महत्त्वाची आणि आवश्यक जबाबदारी असते ती पार पाडणे आवश्यक असते.
शेतकरी तसे धाडस दाखवतो आहे. जोखीम स्वीकारून काम करीत आहेत. मात्र शेतीवर तितकासा अवलंबून नसलेला सामान्य माणूस, ज्याचा रोजगार करोनामुळे अक्षरश: विस्कळीत झाला आहे, त्यांना या पावसाळ्याच्या अनियमित काळातही पुन्हा एकदा जोखीम स्वीकारावीच लागेल आणि आपला रोजगार टिकवण्यासाठी प्रयत्नांची शिकस्त करावी लागेल.
पावसाने पाठ फिरवली असल्याने राज्यात आज 40 ते 50 टक्के भाग जुलै महिन्यातच दुष्काळजन्य परिस्थितीच्या तडाख्यात सापडला आहे. पाण्याचे दुर्भिक्ष जाणवत आहे. 50-55 टक्के भाग कोरडा असल्याचे चित्र निर्माण झाले आहे. स्वाभाविकपणे शेतीवरच्या रोजगाराची आशा मावळत आहे.
ग्रामीण भागातील लोकांना रोजगारासाठी नवीन मार्ग शोधावे लागत आहेत. पण रोजगाराच्या आशेने शहरांकडे पाहावे तर तिथे लॉकडाऊन, निर्बंध आदींचे सावट आहे. अर्थचक्र सुरळीतपणाने सुरू झालेले नसल्याने रोजगारांची प्रचंड टंचाई आहे. त्यामुळे राज्याचा ग्रामीण भाग अत्यंत चिंताग्रस्त बनला आहे. सरकारने याची तातडीने दखल घेतली पाहिजे.