– हेमंत देसाई
“हम दो, हमारे दो’ ही राजकीय शेरेबाजी प्रचलित झाली असली, तरी मुकेश अंबानी आणि गौतम अदानी हे भारतातील पहिल्या व दुसऱ्या क्रमांकावरील श्रीमंत उद्योगपती आहेत, हे वास्तव आहे.
“ब्लूमबर्ग बिलियनेर्स इंडेक्स’च्या ताज्या अहवालानुसार, आशियातील अब्जाधीशांच्या क्रमवारीत अंबानी तेराव्या, तर अदानी चौदाव्या स्थानावर आहेत. अदानी यांनी चीनचे झांग शनशान या उद्योगपतीस मागे टाकले. आता अंबानी यांच्यापेक्षा अदानी यांची संपत्ती केवळ 870 कोटी डॉलर्सनी कमी आहे. अर्थात, अजूनही किमान काही वर्षे तरी अंबानींना मागे टाकणे अदानींना शक्य होईल, असे वाटत नाही. याचे कारण सौदी अरामको या कंपनीबरोबरच्या व्यवहारास अंतिम स्वरूप आले, की रिलायन्स अक्षरशः गगनभरारी घेईल. तसेच फ्युचर रिटेल या कंपनीचा ताबा रिलायन्सने घेतला असून, हे प्रकरण न्यायालयात गेले आहे. याखेरीज, जियो प्लॅटफॉर्म्स आणि रिलायन्स रिटेल यामुळे रिलायन्सचा धंदा बरकतीस येणार आहे.
या दोन्ही कंपन्यांमधील भागभांडवल विकून दोन लाख कोटी रुपये अंबानींकडे आले आहेत.
जियोमधील वेगवेगळ्या गुंतवणुकींमुळे त्याचे मूल्य 4 लाख 36 हजार कोटी रुपयांवर गेले आहे, तर रिलायन्स रिटेलचे मूल्य 4 लाख 60 हजार कोटी रुपयांवर जाऊन पोहोचले आहे. ऑगस्ट 2020 मध्ये अंबानींनी वॉरेन बफे, डायरी पेज आणि सर्जी ब्रिन यांना पिछाडीवर टाकून, अब्जाधीशांच्या यादीत जगातील चौथे स्थान मिळवले.
परंतु त्यानंतरच्या वर्षभरात रिलायन्स इंडस्ट्रीचे शेअर्स घसरल्यामुळे 21 मे 2021 रोजी अंबानींचे जवळपास 40 कोटी डॉलर्सचे नुकसान झाले आणि त्यांच्या कंपन्यांचे नेटवर्थ 77 अब्ज डॉलर्सवर आले. या तुलनेत, अदानींनी याच कालावधीत आपल्या नेटवर्थमध्ये 33 अब्ज डॉलर्सची भर घातली. आज अदानींच्या कंपन्यांचे नेटवर्थ 67 अब्ज डॉलर्स इतके आहे. निदान यावर्षी तरी असे म्हणता येईल की, संपत्ती निर्मितीच्या बाबतीत जेफ बेझोज, एलन मस्क, बिल गेट्स, मार्क झुकेरबर्ग वगैरेंपेक्षा अदानी हे पुढे आहेत. अर्थात, काही दिवसांपूर्वी वादग्रस्त आर्थिक व्यवहारांबद्दलच्या आरोपांमुळे अदानींच्या शेअर्सचे भावही प्रचंड खाली आले होते.
गेल्या वर्षभरात अदानी एंटरप्राइजेस या कंपनीच्या मूल्यात 846 टक्क्यांची वाढ झाली. तर अदानी टोटल गॅस, अदानी ट्रान्समिशन आणि अदानी ग्रीन एनर्जीच्या मूल्यात अनुक्रमे 1044, 744 आणि 467 टक्क्यांची वाढ झाली. तर रिलायन्स इंडस्ट्रीजच्या मूल्यात 38 टक्क्यांची वृद्धी झाली.
मोदी सरकारच्या दृष्टीने अदानी आणि अंबानी हे दोन्हीही लाडके उद्योगसमूह आहेत. परंतु रिन्युएबल एनर्जी किंवा नवीकरणीय ऊर्जा क्षेत्रात या दोन उद्योगपतींमध्ये स्पर्धा आहे. गेल्या 24 जून रोजी मुकेश अंबानी यांनी स्वच्छ ऊर्जा क्षेत्रातील योजनांची घोषणा केली.
त्याबरोबर अदानी ग्रीन एनर्जीचे भाव हे गेल्या वर्षभरात वाढले होते, ते घसरू लागले. 2030 पर्यंत 450 गिगावॅटचे हरित ऊर्जेचे उद्दिष्ट देशाने गाठावे, अशी इच्छा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केली आहे. त्यापैकी 100 गिगावॅटचे उद्दिष्ट पूर्ण करण्याची महत्त्वाकांक्षा बाळगून, अंबानी यांनी त्यासाठी येत्या तीन वर्षांत आपण दहा अब्ज डॉलर्सची गुंतवणूक करणार असल्याचे जाहीर केले आहे.
सोलर सेल्सच्या तसेच मॉड्यूल्स व बॅटरी स्टोअरेजच्या उत्पादनाचा पाया रिलायन्स विस्तारत आहे. त्यामुळे भारताची आयात कमी होईल, तसेच या गोष्टीचा अन्य उत्पादकांनादेखील फायदा होईल. नजीकच्या भविष्यकाळात हरित ऊर्जा उद्योगात रिलायन्स हा महत्त्वाचा खेळाडू ठरणार असून, त्याच्या छायेखाली अन्य कंपन्याही भरारी घेण्याची शक्यता आहे. अदानींना रिलायन्स व अन्य कंपन्यांशी लढत द्यावी लागणार आहे.
अदानी ग्रीन एनर्जीची स्थापना 2015 साली झाली.
अकरा राज्यांत मिळून तिची 15,390 मेगावॅट नवीकरणीय ऊर्जा निर्मिती करण्याची क्षमता आहे. त्यापैकी सर्वाधिक क्षमता सौरऊर्जेची असून, पवन ऊर्जा क्षेत्रातही कंपनीचा दबदबा आहे. गेल्या मे महिन्यातच अदानी ग्रीन एनर्जीने सॉफ्ट बॅंक समूहाशी तिचा भारतातील साडेतीन अब्ज डॉलर्सचा नवीकरणीय ऊर्जा व्यवसाय कब्जात घेण्याबद्दलचा करार केला. 2025 पर्यंत कंपनीकडे 25 गिगावॅट नवीकरणीय ऊर्जाक्षमता असेल. अलीकडेच अदानी समूहाने सहा अब्ज डॉलर्सचे सौर प्रकल्प ताब्यात घेतले असून, त्यामुळे जगातील सौर ऊर्जा ऑपरेटर म्हणून अदानी हे नंबर वन बनले आहेत.
दूरसंचार क्षेत्रात रिलायन्स जियोने 2016 साली प्रवेश केला. त्यावेळी या क्षेत्रात केवळ एक नवीन कंपनी आली, असेच सर्वसाधारण मत होते. परंतु पाच वर्षांत जियोने 40 कोटी ग्राहक मिळवून आपल्या स्पर्धकांना घाम फोडला. त्यामुळे व्होडाफोन व आयडिया या दोन कंपन्यांना अस्तित्व टिकवण्यासाठी एकत्र यावे लागले. भारती एअरटेलने कसाबसा टिकाव धरला आहे. परंतु दूरसंचार क्षेत्रात केवळ तीनच खेळाडू असणे हे हितावह नव्हे, असे प्रकट चिंतन या कंपनीचे सर्वेसर्वा सुनील मित्तल यांनी केले आहे.
जोपर्यंत जियोचे पदार्पण झाले नव्हते, तोपर्यंत एअरटेल असो वा आयडिया किंवा व्होडाफोन, त्या ग्राहकांना फारशा सवलती मिळत नव्हत्या. जियोमुळे त्यांनाही ग्राहकांना वेगवेगळी आमिषे दाखवणे भाग पडले. मात्र, यापुढील काही वर्षांत दूरसंचार क्षेत्रातही जियोचाच एकाधिकार निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. पूर्वी एअरटेल हीच अग्रगण्य कंपनी होती,
जशी नवीकरणीय ऊर्जा क्षेत्रात आज अदानीच अव्वल स्थानी आहे. परंतु उद्या या क्षेत्रातही चमत्कार घडवून रिलायन्स आपल्याला मागे टाकणार नाही, यादृष्टीने अदानींना सिद्ध राहावे लागेल. स्पर्धेमुळे ग्राहकांचा फायदा होतो, असे अर्थशात्रात मानले जाते. परंतु कधी कधी स्पर्धा नष्ट होऊन, मक्तेदारी निर्माण होते आणि ती एकाच नव्हे, तर दोन कंपन्यांची मक्तेदारी असू शकते. अशावेळी त्याचे फटकेही ग्राहकालाच बसू शकतात, हे नाकारता येणार नाही.