लहान मुलांच्या आनंद मासिकाचे संपादक व एक ख्यातनाम बालसाहित्यिक तसेच बालोद्यान या आकाशवाणीवरील बालप्रिय कार्यक्रमातील नाना म्हणजेच गोपीनाथ गणेश तळवलकर यांचा आज स्मृतिदिन.
ते अध्यात्मिक वृत्तीचे होते, आकाशमंदिर, छायाप्रकाश, नंदिता या कादंबऱ्या, ज्ञानेश्वरीतील सौंदर्यविश्व हे रसग्रहण, तसेच मुलांसाठीची अनेक पुस्तके त्यांनी लिहिली. नानांचा जन्म मध्य प्रदेशातील दंडकारण्यातील नर्मदेकाठच्या मंडला या गावी 29 नोव्हेंबर 1907 रोजी झाला. त्यांचे बालपणातील पहिली पाच-सहा वर्षे त्यांना फक्त हिंदीचीच ओळख होती. त्यानंतर पुण्याला आईवडिलांबरोबर आल्यावर त्यांना मराठीची ओळख झाली. पुण्याच्या प्राथमिक व माध्यमिक शाळेत असताना एस. एम. जोशी, नानासाहेब गोरे, तारकुंडे, खाडिलकर त्यांचे वर्गमित्र होते.
मॅट्रिक झाल्यानंतर महाविद्यालयाच्या पहिल्या वर्षाचे शिक्षण घेण्यासाठी ते डोंबिवलीला आले व विल्सन कॉलेजमध्ये प्रवेश घेतला. मात्र, घरच्या परिस्थितीमुळे त्यांना महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण करता आले नाही. वर्ष संपण्याच्या आत चरितार्थासाठी त्यांनी पाचोरा, जळगाव अशा ठिकाणी शिक्षकाची नोकरी पत्करली. मात्र, खानदेशी राहून त्यांना ओढ होती ती पुण्याची. पुणे येथे वासुदेव गोविंद आपटे “आनंद’ हे मुलांसाठीचे मासिक चालवत होते. त्यांनी नानांना मदतनीस म्हणून बोलावले व नानांचीही पुण्याला राहण्याची इच्छा पुरी झाली. आपटे यांना बंगाली भाषा अवगत होती व त्यांनी बंगाली-मराठी कोषही लिहिला होता. त्यांच्याकडून नाना बंगाली शिकले.त्यांना चित्रपट पाहायची आवड होती. आपटे यांच्या पश्चात त्यांनी 35 वर्षे आनंद मासिकाचे संपादकपद सांभाळले. विशेष म्हणजे ते मासिक आजही चालू आहे.
महाविद्यालयात शिकायला मिळाले नाही याची त्यांना खंत होती. त्याची भरपाई नानांनी भरपूर वाचन करून पूर्ण केली. त्यांना तारकुंडे, गोरे, न्यायमूर्ती शिखरे अशा मित्रांची वृत्तपत्रे व पुस्तके मिळण्याच्या कामी मदत झाली. त्यावेळी वर्तमानपत्रातून सनसनाटी बातम्यांपेक्षा महात्मा गांधी, मोतीलाल नेहरू, जवाहरलाल नेहरू, जयकर अशा नेत्यांची भाषणे बरीच विस्ताराने वृत्तपत्रात प्रसिद्ध होत. तसेच युरोपातील पार्लमेंटमधील वादविवादही प्रसिद्ध होत.
त्यांचे पहिले पुस्तक “दुर्वांकुर’ वर्ष 1929 मध्ये प्रकाशित झाले. यात सुमारे 40 कवितांचा संग्रह होता. पुस्तक छापणे व प्रकाशन करणे हे दिव्य आनंद मुद्रणालयाचे मालक आणि “आनंद’चे व्यवस्थापक गोपाळ बळवंत जोशी यांच्यामुळे शक्य झाले. छपाईचा खर्च सवडीने देण्याची सवलत त्यांनी दिली. नानांची कवी म्हणून ओळख निर्माण झाली. या संग्रहातील कविता अनेक क्रमिक पुस्तकांत निवडल्या गेल्या.
भारतात ब्रिटिश राजवटीत 1935-36 मध्ये निवडणुका झाल्या होत्या. त्यात 8 राज्यांत कॉंग्रेस बहुमताने विजयी झाली होती. त्याचे सुंदर विश्लेषण नानांनी त्यांच्या लेखातून करून त्यांच्यातील पत्रकारितेची ओळख दिली.
हिंदी जनता व्यक्तीपेक्षा संस्थेला महत्त्व देण्याच्या मार्गावर नक्कीच जात आहे, मात्र, व्यक्तीमहात्म्य कमी झालेले नाही आणि कायमचे कमी होणे कधीही शक्य नाही, हे त्यांचे त्यावेळचे वाक्य बरेच काही सांगून जाते. 2 ऑक्टोबर 1953 रोजी पुणे आकाशवाणीचे उद्घाटन झाले. त्यांच्या बालचमूच्या करमणुकीचा श्रोत्यांनी डोक्यावर घेतलेला कार्यक्रम म्हणजे बालोद्यान. या कार्यक्रमाची धुरा नानांनी समर्थपणे सांभाळली. नाना, ताई आणि हरबा हे त्रिकुट बालोद्यानवर बालचमूचे मनोरंजन करीत होते. नानांचे 7 जून 2000 रोजी निधन झाले.