भारताला 16 कोटी रुपयांची अन्न मदत
नवी दिल्ली, दि. 6 – भारत सरकारच्या सकस आहार योजनेसाठी “जागतिक अन्न कार्यक्रमा’तर्फे 16 कोटी रुपयांची अन्न मदत देण्यात येणार आहे. याबाबतच्या करारावर समाजकल्याण खात्याचे दयाळ आणि संयुक्त राष्ट्र संघाचे विकास कार्यक्रमाचे प्रतिनिधी माडफोन यांच्या सह्या झाल्या. या करारानुसार वर्षभर देशातील 25,500 केंद्रांमध्ये 44000 टन धान्य, तेल इ. मदत पुरवण्यात येईल.
सरकारचे औषध धोरण
कोचीन – हाथी समितीच्या अहवालावर आधारित नवे औषधाबाबतीत धोरण केंद्र सरकारने जाहीर केले आहे.
आणीबाणी म्हणजे शिस्तीच्या युगास प्रारंभ
नागपूर – सध्याची आणीबाणीची परिस्थिती म्हणजे अनुशासनपर्व सुरू झाले आहे. याचाच अर्थ शिस्तपालनाचे युग सुरू झाले आहे, असे मत आचार्य विनोबा भावे यांनी व्यक्त केले. आचार्यांचे वर्षभर मौन असल्यामुळे हा अभिप्राय त्यांनी लिहून दाखविला. शेवटी इंदिरा गांधींना माझे शुभाशीर्वाद सांगा असेही विनोबाजी म्हणाले.
तांदूळ निर्यातीची परवानगी
विजयवाडा – तांदूळ गिरण्यांना तामिळनाडू, ओरिसा, महाराष्ट्र वगैरे राज्यांना तांदूळ निर्यात करण्याची परवानगी देण्यात येईल, असे आंध्रचे मुख्यमंत्री वेंगलराव यांनी जाहीर केले आहे. हा तांदूळ खासगी व्यापाऱ्यांना दिला जाणार नाही.