उत्तराखंडमधील चामोली जिल्ह्यातील तपोवन परिसरात काल एका हिमशिखराचा कडा कोसळून मोठी नैसर्गिक आपत्ती ओढवली आहे. यात अनेक जणांना प्राणाला मुकावे लागले असून अजूनही दीडशे जण बेपत्ता आहेत. हिमकडा कोसळल्याने धौलगंगा आणि अलकनंदा या नद्यांच्या पातळीतही अचानक वाढ झाल्याने मोठ्या भागात पुराचा धोका निर्माण झाला होता.
उत्तराखंडला गेल्या काही वर्षांपासून लहरी हवामान, बर्फवृष्टी आणि अन्य नैसर्गिक आपत्तीचा सातत्याने फटका बसतो आहे. सारा हिमालयाचा पट्टाच गेल्या काही वर्षांपासून असा धोकादायक बनला आहे. जागतिक तापमान वाढीचा हा सारा परिणाम असल्याचे तज्ज्ञांनी वेळोवेळी सांगितले आहे. जागतिक तापमान वाढीमुळे तापमानात अलिकडच्या काळात कशा प्रकारे वाढ झाली आहे, हिमालयातील बर्फ किती वेगाने वितळतो आहे आणि त्याचे कायकाय गंभीर परिणाम आपल्याला भोगावे लागणार आहेत याचे अनेक अहवाल आणि बातम्या आजपर्यंत वेळोवेळी प्रसारीत झाल्या आहेत. काही दिवस त्यावर चर्चा होते आणि त्यानंतर आपण पुन्हा सारे विसरून जातो.
सन 2013 साली 16 आणि 17 जुनला केदारनाथ परिसरात प्रचंड ढगफुटी झाली होती. त्यात अतोनात नुकसान झाले. जीवितहानीही प्रचंड झाली. त्यात किमान 5 हजार 700 जणांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. तीन लाख लोकसंख्या या आपत्तीमुळे हालअपेष्टांत अडकली. रस्ते आणि त्यावरील पुल मोठ्या प्रमाणात उखडले गेले. उत्तराखंडमधल्या 13 पैकी 12 जिल्ह्यांना याचा मोठा तडाखा बसला. त्यातही रूद्रप्रयाग, चामोली, उत्तरकाशी आणि पिठोरगड या चार जिल्ह्यांमध्ये तर अभुतपुर्व हानी झाली. तेथील स्थिती दुरूस्त करण्यास कित्येक महिने लागले. आता पुन्हा चामोलीत ही नवीन आपत्ती आली.
हिमकडा कोसळल्याने ही दुर्घटना घडली असली तरी ही दुर्घटना मानवनिर्मीत होती असे म्हटले जाते आहे. म्हणजेच त्या भागात जी डोंगर पोखरण्याची कामे सुरू आहेत त्यातूनही अशा घटना तेथे घडत आहेत. थोडक्यात निसर्गाला आपण ज्या प्रमाणात हानी पोहचवत आहोत त्या प्रमाणात आपल्याला त्याची भरपाई करावी लागते असे हे सरळ गणित होऊन बसले आहे. ऋतुमानानुसार होणारा पाऊस आणि बर्फवृष्टीतून फार हानी होत नाही पण अलिकडच्या काळात ऋतु नसताना अचानक अफाट पाऊस पडणे, त्यातून पुर येणे, मोठ्या प्रमाणात बर्फवृष्टी होणे असे प्रकार होऊ लागल्याने तो वातावरणातील बदल आणि तापमान वाढीचा परिणाम मानला गेला आहे.
हिमालयात काही वेळ बर्फवृष्टी होत असली तरी हिमालयाचे एकूण स्वरूप पहाता तेथील बर्फ मोठ्या प्रमाणात वितळू लागल्याने तेथील एकूण बर्फाचे प्रमाणही कमी होऊ लागल्याचे अहवाल आहेत. तापमान वाढले की बर्फ वितळतो हा साधा नियम आहे. पण वितळणारा बर्फ पुढच्या सीझन मध्ये होणाऱ्या बर्फवृष्टीतून भरून निघतो हे जे चक्र असते तेच बिघडले आहे असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. सन 2000 सालापासून हिमालयातील बर्फ वितळण्याचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे. सन 1975 ते 2000 या काळात जितका बर्फ वितळला आहे त्याच्या दुप्पट प्रमाणात सन 2000 पासून बर्फ वितळू लागला आहे. गेल्या 40 वर्षात हिमालयातील 25 टक्के बर्फ वितळला आहे. या बदलत्या भौगोलिक स्थितीचाच विपरित परिणाम उत्तराखंडवासियांना भोगावा लागत आहे.
पुर्णत: हिमालाच्या कुशीत असलेल्या या राज्याला मोठे नैसर्गिक वरदान लाभले असल्याचा आनंद आपण बाहेरचे लोक मानत असतो. पण या लोकांना या लहरी निसर्गाचा कसा फटका बसतो आहे त्याकडे मात्र आपण पुरेश गांभीर्याने पहात नाही. अलिकडच्याच काळांतील काही घटना लक्षात घेतल्या तर 1991 ला या राज्यांतील उत्तरकांशी जिल्ह्यात झालेल्या भूकंपामुळे आठशे लोक दगावले होते, 1998 ला पिठोरगड जिल्ह्यात मालपा येथे दरडी कोसळण्याच्या घटनेत 255 लोक मरण पावले होते. 1999 च्या चामोली भूकंपात किमान शंभरावर लोकांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. त्यानंतर सन 2013 चा महाप्रचंड जलप्रलय या राज्याने अनुभवला आहे.
उत्तराखंडमध्ये सध्या विकासाच्या नावाखालीही निसर्गाचा मोठा विध्वंस सुरू आहे. झाडांची कत्तल होत आहे, डोंगर पोखरले जात आहेत. त्यामुळे या साऱ्या आपत्तीना मानवच निमंत्रण देत आहे. विजनिर्मिती हा राज्याचा सध्याचा एक मोठा उद्योग आहे. सध्या त्या भागात एकूण 39 वीज निर्मिती प्रकल्प सुरू असून त्यातून 3971 मेगावॅट वीज निर्मीती केली जाते. हा नैसर्गिक जलस्त्रोतावर चालणारा किफायतशीर उद्योग असल्याने अनेक खासगी वीज उत्पादक कंपन्यांनी इकडे धाव घेऊन वीज निर्मीती प्रकल्प सुरू करण्याचा सपाटाच चालवला आहे. त्यातून निसर्गाचे जे नुकसान होते, त्याचीच परिणती अशा आपत्तीत होते आहे याचे इशारे जगभरातील पर्यावरण तज्ज्ञांनी देऊनही आपल्यावर त्याचा काहीच परिणाम होताना दिसत नाही.
राष्ट्रीय हरित लवादाकडे जाऊन काही पर्यावरणवादी कार्यकर्ते या विषयावर आवाज उठवतात. त्यांना कधी यश येते, कधी अपयश. पण त्यांचे हे लढे सुरूच असतात. काही वेळा न्यायालयाचाही रस्ता या कार्यकर्त्यांना धरावा लागतो. विविध प्रकल्पांना स्थगिती मिळवण्याचा प्रयत्न हे कार्यकर्ते करीत असतात. तेव्हा त्यांची टर उडवण्याचेच काम आपण करीत असतो. या राज्यातील आणखी 24 वीज प्रकल्प कोर्टाने बंदी घातल्यामुळे सध्या स्थगित अवस्थेत आहेत.
आता तेथे चारधाम यात्रेसाठी बारमाही रस्तांचे काम सुरू असून त्यासाठीही मोठ्या प्रमाणात जंगलतोड आणि डोंगर पोखरण्याचे काम सुरू आहे. हा सारा प्रकार पाहिल्यानंतर या राज्याला भविष्यात आणखी किती गंभीर परिणामांना सामोरे जावे याची कल्पना करवत नाही. गेल्या तीन दशकांमध्ये चार मोठ्या आपत्तींना तोंड दिल्यानंतर काल पुन्हा चामोलीत जी आपत्ती आली आहे त्यातून आता तरी सावध व्हा असा संदेश निसर्गाने दिला आहे. त्यापासून आपण किती बोध घेणार यावर तेथील लोकांचे भवितव्य अवलंबून आहे.