संपूर्ण जग आज अशा अंधारलेल्या वाटेवर उभे आहे की, जेथे आपल्याला पुढे जाण्यासाठी असामान्य एकतेची आणि जागतिक स्तरावर संयुक्त प्रयत्नांची गरज आहे. संयुक्त राष्ट्रांचे महासचिव अँटोनिओ गुटेर्रस यांचे हे वक्तव्य. निमित्त होते संयुक्त राष्ट्रांच्या स्थापनेला 75 वर्षे पूर्ण झाल्याबद्दल आयोजित करण्यात आलेल्या महासभेचे.
महसचिवांचे वक्तव्य चांगले आहे. त्यांचा हेतूही चांगला असावा. मात्र, प्रश्न एवढाच आहे की आज सदस्य राष्ट्रे ते ऐकण्याच्या मनःस्थितीत आहेत का? दुसरा प्रश्न त्यांनी संयुक्त राष्ट्राचे का ऐकावे? तिसरा प्रश्न संयुक्त राष्ट्राचा तेवढा धाक अथवा दबाव राहिला आहे का आणि शेवटचा प्रश्न या 75 वर्षांच्या काळात संयुक्त राष्ट्रांनी काळानुरूप बदल का केला नाही? दुर्दैवाने गुटेर्रस यांच्या या वक्तव्याची बोळवण याच महासभेत केली गेली. गेल्या काही काळापासून जगात ज्या घटना घडत आहेत त्या पाहता केवळ काही घडल्यानंतर एक पत्रक जारी करणे, अधूनमधून कोणाला तरी काही सूचना करणे, प्रामुख्याने विकसनशील देश अथवा त्याच्याही खालच्या पायरीवरील देशांना सूचना करणे, क्वचितप्रसंगी शहाणपणाचे बोल ऐकवणे, बड्या-दांडगाई करणाऱ्या राष्ट्रांच्या आगावूपणाकडे किंवा फिल्मी भाषेत सांगायचे झाले, तर दबंगगिरीकडे सोयीस्कर दुर्लक्ष करणे या पलीकडे या संघटनेने व तिच्या त्या त्या वेळेच्या प्रमुखांनी काही केले नाही.
एकीकडे गुटेर्रस यांनी स्वप्नवाद व्यक्त केला असताना आणि सगळ्यांना भावनिक शब्दांत साद घातली असताना अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी त्यांची या संघटनेच्या मंचावर जाहीर हेटाळणी केली. आपण एका जागतिक संघर्षाला सामोरे जात आहोत. अदृश्य शत्रू असणाऱ्या चिनी विषाणूविरोधात आपण लढत आहोत. करोनावर नियंत्रण मिळवण्यात चीनला अपयश आले आहे. तसेच त्याचा जगभर प्रसार झाल्याबद्दल चीनला जबाबदार धरले जावे, अशी मागणीच ट्रम्प यांनी केली. चीनला करोना काय आहे, याची पूर्ण कल्पना होती. त्यांनी तरीही त्याची खबरदारी घेतली नाही. जगाला सावध केले नाही. त्यांनी देशांतर्गत विमान उड्डाणे बंद केलीत. मात्र आंतरराष्ट्रीय विमानसेवा सुरूच ठेवली. त्यामुळे एका देशातील, एका प्रांतातील, एका शहरातला हा विषाणू आज जगभर पोहोचला, असा आरोप ट्रम्प यांनी केला. त्यांच्या आरोपात तथ्य आहे. मात्र, तो नंतरचा मुद्दा.
संयुक्त राष्ट्राच्या व्यासपीठावरच त्यांनी थेटपणे मांडला, हा आताचा विषय. दुसऱ्या महायुद्धाच्या समाप्तीनंतर संयुक्त राष्ट्राची स्थापना करण्यात आली. त्या युद्धातील भीषण संहार आणि उद्ध्वस्त झालेली राष्ट्रे पाहून भविष्यात पुन्हा असे काही होऊ नये ही स्थापनेमागची भूमिका होती. गेल्या 75 वर्षांच्या काळात तिसरे महायुद्ध झाले नाही या आनंदात एकवेळ राहता येईल. मात्र, त्याचवेळी शक्तिशाली राष्ट्रांचाच या संघटनेवर प्रभाव राहिला व त्यांच्याच सावलीत ती वाढली व पोसली गेली. त्यामुळे या राष्ट्रांच्या मर्जीच्या विरोधात काही करू न शकल्याने आज या संघटनेच्या भिंती खिळखिळ्या झाल्या आहेत, हे सत्य कसे दुर्लक्षित करता येईल? एक काळ अडसा होता जेव्हा अमेरिकेला रशियाचे आव्हान होते. अमेरिकेवर थोडा दबाव होता. मात्र, तरीही आर्थिक ताकद आणि शस्त्रास्त्रांचे भांडार या बळावर अमेरिकेने जेथे जेथे म्हणून करता येईल तेथे दादागिरी केली.
रशियाच्या विघटनानंतर त्यांना तुल्यबळ प्रतिस्पर्धीच राहिला नव्हता. त्यामुळे एकध्रुवीय जग किंवा अमेरिका म्हणेल तसेच अथवा सगळेच अमेरिकेभोवती फिरणारे अशी जगाची रचना झाली. त्या वर्चस्वाला चीनने हादरे देण्यास सुरुवात केली. चीनचा गेल्या दीड ते दोन दशकांतला महासत्ता म्हणून झालेला उदय आणि लक्ष्य साध्य करण्यासाठी त्यांनी दाखवलेला वेग जगाला स्तिमित करणारा होता. आज अमेरिकेला प्रत्येक ठिकाणी स्पर्धा करायला लावण्यास व प्रसंगी मात खायला लावण्यातही चीन सक्षम झाला आहे. रशियाची एकेकाळची जागा आज चीनने घेतली हे खरे. मात्र, त्यामुळे संयुक्त राष्ट्रात काही बदल झाला नाही. डझनभर आंतरराष्ट्रीय संस्था संयुक्त राष्ट्राच्या छत्राखाली चालतात. पण त्यांचा कोणावरच अंकुश नाही. ज्या करोनाचा ट्रम्प चिनी व्हायरस असा उल्लेख करतात त्या करोनाबाबत आरोग्य संघटनेला कल्पना होती. तरीही ते गप्प बसले. त्याला कारण ते चीनवर अवलंबून होते व आहेत, असाही आरोप झाला आहे.
आज जगाची उघडउघड दोन गटांत विभागणी होत चालली आहे. पहिल्या महायुद्धाच्या व नंतर दुसऱ्या महायुद्धाच्या अगोदर जशी स्थिती होती तसेच चित्र आज नव्या जगात दिसते आहे. अशात तिसरे महायुद्ध झाले नाही याचा आनंद मानताना दोन बड्या राष्ट्रांच्या कंपूशाहीमुळे किंवा थेट त्यांच्या बेमुर्वतखोरपणामुळे जगात ठिकठिकाणी कशी युद्धे होत आहेत याकडे लक्ष द्यायला कोणाला वेळ नाही. संयुक्त राष्ट्रे फक्त पत्रक आणि निषेधापुरते. अफगाणिस्तान, पॅलेस्टाइन, सीरिया, लेबनॉन अशी कितीतरी उदाहरणे आहेत. संपन्न राष्ट्रे तेथे थेट संघर्ष करत आहेत अथवा त्यांची शस्त्रे अथवा पैसे घेऊन लढणारे त्यांचे बगलबच्चे रक्तपात करत आहेत. यात त्या मोठ्या राष्ट्रांना कोणतीच झळ नाही. युद्ध त्यांच्या भूमीवर होत नाही त्यामुळे त्यांचे नुकसान नाही. त्या राष्ट्रांना रोखणारे कोणी नाही. ज्या संघटनेने हे करणे अपेक्षित आहे, त्यांना कोणी जुमानत नाही.
जगाची दोनच राष्ट्रांनी वाटणी करून घेतली असून त्यांचे स्वत:चे कायदे आणि निर्बंध सगळीकडे सुरू आहेत. गुटेर्रस एकीकडे सगळ्यांनी एकत्र येण्याची भाषा करतात. त्याच वेळी चीन स्वत:चा मार्ग तयार करण्यासाठी दुसऱ्या सार्वभौम राष्ट्रांची भूमीही बळकावतो आहे आणि समुद्रावरही आपला हक्क सांगतो आहे. उद्या अंतरिक्षावरही हक्क सांगितला तर त्यात नवल वाटून घ्यायचे कारण नाही. अमेरिकेला आव्हान दिले जाऊ लागल्यामुळे अमेरिकेला ते सहन होत नाही. त्यांना एककल्ली निर्णय घ्यायची व ते राबवायची सवय झाली आहे. त्यात चीनचा अडसर होऊ लागल्यामुळे त्यांची चीडचीड होते आहे, हाच या साऱ्याचा व ट्रम्प यांच्या गरळ ओकण्यामागचा अर्थ. भारताच्या संदर्भात बोलायचे झाले तर संयुक्त राष्ट्रांना खऱ्या अर्थाने कालसंगत राहायचे असेल तर सर्वप्रथम आपल्यात बदल घडवावे लागतील अशी भूमिका भारताने सातत्याने मांडली आहे. परवाही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्याचा पुनरूच्चार केला.
दुसऱ्या महायुद्धाच्या समाप्तीनंतर जी स्थिती होती, ती आज नाही. भारतासारखी अनेक राष्ट्रे आर्थिक आणि सामरिकदृष्ट्या बलशाली झाली आहेत. त्यांना काठावर बसवून केवळ पाचजणांनी सुरक्षा परिषदेत नकाराधिकार वापरून जगाच्या भाग्याचा फैसला करायचा, हे मान्य होऊ शकत नाही. जर ते इच्छेविरुद्ध मान्य करावेच लागले तर संयुक्त राष्ट्र ही संघटना म्हणून दिवसागणिक दुबळी ठरत जाईल. त्यामुळे गुटेर्रस यांनी सगळ्यांना सोबत घेण्याचे आवाहन करताना बदलाचे आव्हान स्वीकारण्याचीही तयारी ठेवली पाहिजे. अन्यथा करोनाच काय अन्य कोणती महामारी आली तरी संपत्ती व शक्तीने उन्मत्त झालेली राष्ट्रे कोणाच्या छत्राखाली जाणार नाहीत व सगळ्यांना एकत्रही येऊ देणार नाहीत.