पुणे- जिल्ह्यात करोना संसर्गाचा वेग दिवसेंदिवस वाढत आहे, अशा परिस्थितीत रुग्णांना तत्काळ उपचार मिळावेत यासाठी जिल्हा परिषदेने पुढाकार घेत तब्बल 51 रुग्णवाहिका खरेदी करून जिल्ह्यात पाठवून दिल्या. या सर्व रुग्णवाहिकेत ऑक्सिजन सुविधा असून आता रुग्णवाहिकेअभावी रुग्णांची होणारी “हेळसांड’ नक्कीच कमी होईल. या रुग्णवाहिका ग्रामीण भागासाठी “संजीवनी’ ठरतील, असा विश्वास उपमुख्यमंत्री व पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केला.
जिल्ह्यातील ग्रामपंचायतींना 14व्या वित्त आयोगातून मिळालेल्या निधीमधून जिल्हा परिषदेच्या प्राथमिक आरोग्य केंद्रांसाठी या अत्याधुनिक रुग्णवाहिका खरेदी करण्यात आल्या आहेत. त्याचा लोकार्पण सोहळा शुक्रवारी अजित पवार यांच्या हस्ते पार पडला.
त्यावेळी कामगारमंत्री दिलीप वळसे पाटील, राज्यमंत्री दत्तात्रय भरणे, जिल्हा परिषद अध्यक्षा निर्मला पानसरे, मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी भारत शेंडगे, उपाध्यक्ष रणजित शिवतरे, बांधकाम व आरोग्य समितीचे सभापती प्रमोद काकडे, कृषी सभापती बाबुराव वायकर, महिला व बालकल्याण सभापती पूजा पारगे, समाजकल्याण सभापती सारिका पानसरे, पंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोहीनकर, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. भगवान पवार उपस्थित होते.
जिल्हा परिषदेत एकूण 97 प्राथमिक आरोग्य केंद्र आहेत. त्यामध्ये काही केंद्रांकडे रुग्णवाहिका आहेत. मात्र, त्या शेवटच्या घटका मोजत आहेत. आता, करोना संसर्ग आणि रुग्णवाहिकांची अपुरी व्यवस्था यामुळे नव्याने खरेदी करण्यात आलेल्या रुग्णवाहिका जिल्ह्यासाठी महत्वपूर्ण ठरणार आहेत. पहिल्या टप्प्यात 51 रुग्णवाहिका खरेदी करण्यात आल्या असून त्यामध्ये आंबेगाव, बारामती आणि मावळ येथे प्रत्येकी 6, भोर, हवेली, इंदापूर, पुरंदर तालुक्यात प्रत्येकी 5, दौंड, खेड, मुळशी, शिरूर येथे प्रत्येकी 3 आणि वेल्हा येथे 1 त्याचबरोबर हिंजवडी, कुरकुंभ, सणसवाडी, शिक्रापूर आणि रांजणगाव गणपती या पाच ग्रामपंचायतींनी स्वनिधीतून खरेदी केलेल्या रुग्णवाहिकांचे लोकार्पणही यावेळी करण्यात आले. यावेळी जिल्हा परिषद सदस्य वीरधवल जगदाळे, चंद्रकांत बाठे, शंकर मांडेकर, अभिजीत तांबिले, दिलीप यादव उपस्थित होते. सुत्रसंचालन आशिष जराड यांनी केले.
चौकट —
रुग्णवाहिका व्यवस्थित वापरा : पवार
जिल्हा परिषदेने राबविलेला उपक्रम स्तुत्य आहे, असे सांगत अजित पवार म्हणाले, रुग्णवाहिकांचा वापर व्यवस्थित करा, रुग्णांना तात्काळ उपचार मिळतील, त्यांचा जीव वाचेल त्यावेळी जिल्हा परिषदेने रुग्णवाहिका खरेदी करण्यासाठी केलेल्या प्रयत्नाला यश येईल. जिल्ह्यात आतापर्यंत साडेसात कोटी रुपयांचा दंड वसूल केला. त्यावरून आजही अनेक नागरिक नियमांचे पालन करत नाही, ही दुर्दवी बाब आहे. “अरे बाबांनो नियम पाळा’. विधानभवन येथे उपस्थितांना गर्दी करू नका, सोशल डिस्टन्सिंग पाळा, असा सल्लाही पवार यांनी दिला.