“शब्दचि आमुच्या जीवाचे जीवन। शब्द वाटू धन जनलोका।।’ हे तुकोबांचे शब्द केवळ आमच्या नेतेमंडळींनीच सीरिअसली घेतले. शब्द हे लोकांना वाटण्याचं धन आहे, म्हणजे नेमकं काय हे त्यांनी जाणलं आणि केवळ शब्दसंपत्तीवर सत्तेचे डोलारे उभारले; सांभाळले.
बिचाऱ्या जनतेला तरी शब्दांशिवाय दुसरं काय लागतं हो? नेत्यांकडे जितकी शब्दसंपदा, तेवढी सुखी-समाधानी जनता! मागत काहीच नाही; उलट भरभरून देते- टाळ्या, हारतुरे, मानसन्मान आणि मतंही! टाळ्या जसजशा वाढत जातात तसतसा नेत्यांचा “ठेवणीतला’ शब्दसंग्रह बाहेर यायला लागतो आणि मग एखाद्या दिवशी ते वादात अडकतात.
अर्थात, वादात अडकणं हे काही पूर्वीइतकं अग्निदिव्य राहिलेलं नाही. उलट ती आवश्यक बाब बनलीय आणि मुद्दाम वाद ओढवून घेणं हे हल्ली कौशल्याचं लक्षण मानलं जातंय. वाद वाढतो, उलटसुलट प्रतिक्रिया येतात, धमक्या वगैरे येतात, पाठोपाठ संरक्षण मिळतं आणि रुबाब वाढतो. बेताल बोलून एकदा माणूस फेमस झाला, की प्रत्येक घडामोडीत “प्रतिक्रिया’ घ्यायला मीडियावाले (एरवी फिरकलेही नसते) त्याच्याकडे येऊ लागतात. एखाद्या विषयावरून राजकीय वाद रंगला तर या “शब्दसंपदे’चा वापर मूळ विषय बाजूला ठेवण्यासाठी होतो. वादात कुणी कुणाविषयी असभ्य शब्दांचा वापर केला तर “असंसदीय शब्द’ हाच वादविषय होतो आणि वाद कोणत्या विषयावरून सुरू झाला हेच लोक विसरून जातात. एकंदरीत आनंदीआनंद!
व्यवहारात आपण ज्याला “असंसदीय शब्द’ म्हणतो, त्याचा अर्थ संसदेच्या प्रतिष्ठेला शोभणार नाही, असा शब्द! सबब, बाहेर भाषा कशीही वापरली तरी संसदेत मात्र नेतेमंडळींना तोलूनमापूनच बोलावं लागतं. अठरा तारखेला सुरू होत असलेल्या पावसाळी अधिवेशनात तर खासदारांची कसोटीच लागणारंय. कारण लोकसभा सचिवालयाने असंसदीय शब्दांची पुस्तिका प्रकाशित केलीय. म्हणजे, संसदेत जाऊन काय बोलायचं, हा प्रश्न ज्यांना नेहमी पडतो, त्यांना यावेळी काय बोलायचं नाही, हा प्रश्न पडणारंय.
नव्या यादीनुसार दलाल, बालबुद्धी, दादागिरी, लॉलिपॉप, भेकड, गुन्हेगार, मगरीचे अश्रू हे शब्द “असंसदीय’ म्हणून जाहीर करण्यात आलेत. एवढंच नव्हे तर “संवेदनहीन’ हा शब्दही “बाद’ यादीत सामील झालाय. “गाढव’ हा शब्द एकवेळ टाळता येईल; पण “भ्रामक’, “खोटे’ हे शब्द कसे टाळणार? “लाजिरवाणे’, “विश्वासघात’, “भ्रष्ट’ हे शब्दही असंसदीय शब्दांच्या यादीत गेलेत. इंग्रजीत (बोलायचंच, असा निर्धार केला असेल तर) “अब्यूज्ड’, “अशेम्ड’, “चीटेड’, “बेट्रॉइड’ असे शब्द वापरायचे नाहीत, हे लक्षात ठेवायचंय. “अराजक’, “हुकूमशाही’ अशा शब्दांनाही बंदी घातलीय; मग बोलायचं काय, असा प्रश्न अनेकांना पडलाय म्हणे! संसदेबाहेर नकळत किंवा जाणूनबुजून जे शब्द वापरण्याची सवय जिभेला जडलीये, तिचं काय करायचं?
नव्या यादीतला सगळ्यात महत्त्वाचा शब्द आहे “नाटक’! “नाटकं बंद करा,’ हे म्हणणं सोपं असलं तरी प्रत्यक्षात नाटक करणं अजिबात सोपं नसतं, हे जावे नाटकवाल्यांच्या वंशा, तेव्हाच कळे! केवळ शब्दांवर बंदी न घालता अभिनयावरही बंदी घातली, तर बरेच जण संसदेत बोलणारच नाहीत. शिवाय, नाटक म्हणजे सत्याचा आभास. त्यामुळे बंदी केवळ “नाटक’ या शब्दावर असणार की सत्याच्या आभासावरही असणार, हेही अद्याप स्पष्ट झालेलं नाही.