अवघ्या 44 सेकंदांच्या त्या व्हिडिओनं लाखो लोकांना हादरवून सोडलं. अवघ्या काही तासांत तो हजारो वेळा शेअर केला गेला. शुक्रवारी रात्री उशिरा तो व्हिडिओ पाहायला मिळाला (खरं तर “पाहावा लागला’) त्यावेळी असं वाटलं, प्रत्येकाच्या हातात कॅमेरे आले हीच मोठी शोकांतिका आहे. फोटो, व्हिडिओ वगैरे इतकं चिल्लर व्हायलाच नको होतं. 24 किंवा 36 फोटो काढणारा रोलचा कॅमेरा होता, तोच काळ बरा होता. शे-पाचशे लोकांमध्ये एखाद्याच्या हातात हा कॅमेरा असायचा.
फोटोग्राफर “रेडी’ म्हणायचा आणि सगळेजण भोळसटपणे पोज द्यायचे आणि तो “स्माइल’ म्हणायचा तेव्हा इमानदारीत हसायचे. व्हिडिओ कॅमेरावाला तर फक्त लग्नात दिसायचा. आता शेकडो फोटो काढले जातात आणि लगेच अडगळीतसुद्धा पडतात. मग नवे काढले जातात. पण फोटोत, व्हिडिओत काही “चार्म’च उरला नाही. त्याहीपेक्षा भयंकर गोष्ट म्हणजे पोज देण्यातला भोळसटपणा आणि कॅमेरा क्लिक होताना हसण्यातली इमानदारी संपली.
स्वतःच स्वतःची छबी वारंवार, वारंवार टिपताना आपण सगळे अभिनेते झालो. व्हिडिओ काढता-काढता डायरेक्टरही झालो. (या दोन्ही गोष्टी सोप्या नाहीत; पण आपल्याला तसं वाटू लागलं.) वरवर मस्त मुलामा चढत गेला आपल्या चेहऱ्यावर… पण तितकेच आतून आपण कोरडे, बोथट आणि निलाजरे झालो. आपल्यातली संवेदनशीलता या नवतंत्रज्ञानानं गिळून टाकली… आपल्यातला माणूसपणा आपणच चावून-चावून थुंकून टाकला.
एका व्हिडिओमुळे एवढे सगळे विचार का मनात यावेत? असं काय आहे त्या व्हिडिओत? महामार्गाच्या रुंदीकरणासाठी एक झाड तोडलं जातंय. त्या झाडावर शेकडो पक्षी आहेत. झाड उभ्याचं आडवं होता-होता जेवढे पक्षी सावध होतात, तेवढे उडून जातात. जे गाफील राहतात ते रस्त्यावर आपटून, फांदीच्या ओझ्याखाली सापडून मरतात. काळ्या रंगाच्या या पक्ष्यांची असंख्य घरटी नेस्तनाबूत होतात. असंख्य अंडी फुटून पक्ष्यांची पुढची पिढी जन्म घेण्याआधीच भुईवर सांडते. रस्त्यावर तडफडत पडलेले पक्षी एखाद्या वाहनाखाली चेंगरू नयेत म्हणून काही माणसं त्यांना फरफटत रस्त्याकडेला आणून सोडतात. कित्ती-कित्ती उपकार ना..?
कोणे एके काळी घड्याळं नव्हती तेव्हा किलबिलाट करून या पक्ष्यांनी भल्या पहाटे आपल्याला जागं करण्याचं काम केलं, त्याची ही परतफेड समजावी का? तसंही म्हणवत नाही. आपण जागे झालोयच कुठे? नैसर्गिक आपत्तींनी थैमान घातलंय तरीही आपण जागे झालेलो नाही. आपल्याला चार-सहा-आठपदरी रस्ते हवेत. अगदी डोंगरातूनसुद्धा! कारण आपल्याला पर्यटन वाढवायचंय; विकास साधायचाय. अंतर कमी करून वेग वाढवायचाय. मग अडथळा वाटणारं सगळं पाडायचं. डोंगर उभे तासायचे; झाडं आडवी पाडायची. सजीव पशु-पक्ष्यांचा, निर्जीव डोंगरदऱ्यांचा या पृथ्वीवर हक्क आहेच कुठं?
तरी मग हे असे व्हिडिओ अस्वस्थ का करतात? हजारो वेळा फॉरवर्ड का होतात? या व्हिडिओत बॅक्ग्राउंडला कुणीतरी मस्तपैकी सॅड म्युझिक लावलंय. बासरी, पियानो आणि शेवटी व्हायोलिन ऐकू येतं… त्या पक्ष्यांइतकंच केविलवाणं..! घटना केरळची… हां-हां म्हणता देशभर पोहोचते. पाहून सगळे इतके गपगार होतात, की वाटतं दोन मिनिटं उभं राहून श्रद्धांजली वाहतील आता! पण पाचच मिनिटांत आपण सावरतो…नव्या व्हिडिओची वाट पाहू लागतो… संगीतासह!