शारजा :– विराट कोहलीने अफलातून अर्धशतकी खेळी करत भारतीय संघाच्या धावसंख्येला आकार दिला मात्र, त्याची ही खेळी भारतीय गोलंदाजांच्या सुमार कामगिरीमुळे व्यर्थ ठरली. आशिया करंडक क्रिकेट स्पर्धेतील हा हायव्होल्टेज सामना पाकिस्तानने भारताचा 5 गडी राखून पराभव करत जिंकला व अंतिम फेरीतील स्थानाची दावेदारी आणखी भक्कम केली.
भारताने विजयासाठी दिलेल्या 182 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना पाकिस्तानने थाटात सुरुवात केली. मात्र कर्णधार बाबर आझम पुन्हा एकदा आक्रमक फलंदाजी करण्याच्या प्रयत्नात बाद झाला. मात्र, महंमद रिझवानने एका बाजूने भारताच्या गोलंदाजांवर हल्ला चढवला. बाबरच्या जागी आलेल्या फखर झमानने निराशा केल्याने त्यांच्यावरचे दडपण वाढले होते. त्यावेळी महंमद नवाज खेळपट्टीवर आला व त्याने रिझवानच्या साथीत धडाकेबाज फलंदाजी केली. या जोडीने संघाचे शतक फलकावर लावले.
झमान तापदायक ठरणार असे वाटत असतानाच भुवनेश्वर कुमारने त्याला बाद केले. त्याने अवघ्या 20 चेंडूत 6 चौकार व 2 षटकारांच्या मदतीने 42 धावांची महत्त्वपूर्ण खेळी केली. नवाजच्या पाठोपाठ रिझवानही परतला. त्याने 51 चेंडूंचा सामना करताना 6 चौकार व 2 षटकारांची आतषबाजी करत 71 धावा केल्या. रिझवान बाद झाल्यावर भारताच्या विजयाच्या आशा पल्लवीत झाल्या होत्या. मात्र, भारताच्या गोलंदाजांनी दिशाहीन गोलंदाजी करत पाकिस्तानचा विजय सोपा केला. त्यावेळी अर्शदीप सिंगने असीफ अलीचा झेल सोडला व संघावरील दडपण आणखी वाढले.
प्रमुख फलंदाज बाद झाल्यावरही खुशदील शाहने जबाबदारीने फलंदाजी केली. त्यावेळी पाकिस्तानला विजयासाठी 2 षटकांत 26 धावांची गरज होती. त्याने डावातील 19 व्या भुवनेश्वर कुमारच्या षटकात तब्बल 19 धावा वसूल केल्या. अखेरचे षटक अर्शदीपने टाकले. त्याने या षटकांत असीफ अलीला 16 धावांवर बाद केले मात्र, तरीही खुशदीलने इफ्तेकार अहमदच्या साथीत कोणतेही दडपण न घेता फलंदाजी केली व संघाला 19.5 षटकांत विजय मिळवून दिला. त्याने 11 चेंडूत 1 चौकार फटकावताना नाबाद 14 धावा केल्या.
20 व्या षटकात दोन चेंडूंवर त्यांना विजयासाठी दोन धावा हव्या असताना इफ्तेकारने पाचव्या चेंडूवर दोन धावा घेत संघाचा विजय साकार केला. भारताकडून रवी बिष्णोई, अर्शदीप सिंग, भुवनेश्वर कुमार, यजुवेंद्र चहल व हार्दिक पंड्या यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला. मात्र, भारताचे सर्वच गोलंदाज अत्यंत महागडे ठरले. या डावात भारताच्या गोलंदाजांनी केलेली दिशाहीन गोलंदाजी पाकिस्तानच्या पथ्यावर पडली. आता येत्या मंगळवारी भारताचा श्रीलंकेशी तर, गुरुवारी अफगाणिस्तानशी सामना होणार आहे. अंतिम फेरीत स्थान मिळवण्यासाठी भारताला हे दोन्ही सामने जिंकणे आवश्यक आहे.
That’s that from another close game against Pakistan.
Pakistan win by 5 wickets.
Up next, #TeamIndia play Sri Lanka on Tuesday.
Scorecard – https://t.co/xhki2AW6ro #INDvPAK #AsiaCup2022 pic.twitter.com/Ou1n4rJxHu
— BCCI (@BCCI) September 4, 2022
तत्पूर्वी, पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझमने नाणेफेक जिंकत भारताला पहिल्यांदा फलंदाजी दिली. नाणेफेक हरल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना ( #INDvPAK ) भारताने 20 षटकांत 7 गडी गमावून 181 धावा केल्या होत्या. विराट कोहलीने 44 चेंडूत सर्वाधिक 60 धावा केल्या. विराट कोहलीने आशिया कपमध्ये सलग दुसरे अर्धशतक झळकावले आहे. त्याने 36 चेंडूत टी-20 आंतरराष्ट्रीय कारकिर्दीतील 32 वे अर्धशतक झळकावले. कोहलीने आपल्या खेळीत चार चौकार आणि एक षटकार लगावला. शेवटच्या षटकात तो बाद झाला. 20 व्या षटकात, हॅरिसने पहिल्या चार चेंडूत दोन धावा दिल्या आणि विराट कोहली धावबाद झाला.
यानंतर रवी बिश्नोई शेवटच्या दोन चेंडूंवर फलंदाजीस आला आणि त्याने सलग दोन चेंडूंत दोन चौकार मारले. फखर जमानचे खराब क्षेत्ररक्षण दोन्ही वेळेस पाहायला मिळाले. शेवटच्या चेंडूवर फखरने बिश्नोईचा सोपा झेल सोडला. अशा प्रकारे भारताने शेवटच्या षटकात 10 धावा केल्या. टीम इंडियाने शेवटच्या पाच षटकात 46 धावा केल्या आणि दोन विकेट गमावल्या.
रोहित शर्मा आणि केएल राहुल प्रत्येकी 28 धावा करून बाद झाले. त्याचवेळी सूर्यकुमार यादवला 13 धावा करता आल्या. दिनेश कार्तिकच्या जागी आलेल्या ऋषभ पंतला 14 धावा करता आल्या. पाकिस्तानकडून शादाब खानने 2 विकेट घेत 31 धावा दिल्या.