विद्यार्थिनींसाठी “संत जनाबाई’ वसतिगृह ः कोनशिला बसविली
पुणे, ता. 20 – मागासलेल्या वर्गातील विद्यार्थिनींसाठी मुंबई सरकारच्या समाज कल्याण विभागातर्फे बांधण्यात यावयाच्या “संत जनाबाई’ वसतिगृहाचा कोनशिला समारंभ आज सकाळी समाजकल्याण खात्याचे मंत्री तिरपुडे यांच्याहस्ते करण्यात आला. या प्रसंगी बोलताना तिरपुडे म्हणाले, मागास वर्गातील लोकांना सध्या मिळणाऱ्या सवलती लोकांच्या डोळ्यात खुपत आहेत. पण हजारो वर्षे उपेक्षित व मानहानीकारक जीवन कंठीत आलेल्या या समाजाला काही सवलती मिळाल्या तर त्यांच्यावर काही खास उपकार झाले असे मानण्याची भावना या लोकांत का निर्माण व्हावी हे मला समजूच शकत नाही.
आजपर्यंत या वर्गातील लोकांनी समाजाची जी सेवा केली त्यामानाने त्यांना देण्यात येणाऱ्या या सवलती काहीच नव्हेत अशी खरी वस्तुस्थिती आहे. शिवाय समाजातील सर्व घटकांची उन्नती झाली नाही तर एकंदर समाजाची प्रगती देखील वेगाने होणार नाही ही गोष्ट त्यांनी लक्षात घ्यावयास हवे. केवळ मोफत शिक्षणाने व शिष्यवृत्त्यांनी या गरीब विद्यार्थ्यांचा प्रश्न सुटत नाही.
विद्यापीठाचे कार्य, डॉ. झाकीर हुसेन यांचे विचार
कलकत्ता – विद्यार्थ्यांचा व्यक्तिविकास घडवून त्यांना सामाजिक जबाबदारीची जाणीव देण्याचे कार्य विद्यापीठांनी प्रामुख्याने केले पाहिजे, असे विचार बिहारचे राज्यपाल डॉ. झाकीर हुसेन यांनी व्यक्त केले.
कलकत्ता विद्यापीठाच्या पदवीदान समारंभाचे प्रसंगी भाषण करताना राज्यपाल म्हणाले, नीतिमान विद्यार्थी तयार होणे हेच उत्तम शिक्षणाचे लक्षण आहे. विद्यार्थ्यांचे व्यक्तिमत्त्व चांगले करण्याचे ध्येय ठेवले तर सामाजिक उन्नती घडविण्याच्या दृष्टीनेच त्याकडे पाहिले पाहिजे.
पुण्याच्या परिसरातील आदिवासींच्या शिक्षणाची सोय होणार
पुणे – बॅकवर्ड क्लास सोशल वेलफेअर सेंटरचे सेक्रेटरी कृष्णराव एस. कांबळे यांनी पुण्याचे आसपास डोंगराळ व जंगल भागांत वास्तव्य करीत असलेल्या आदिवासी (फासेपारधी) जमातीच्या लोकांना समक्ष भेटून त्यांना उपलब्ध असलेल्या सरकारी सवलतीची माहिती व इतर आर्थिक व शैक्षणिक दृष्टीने पुढे येण्याचे मार्ग समजावून सांगितले. त्यांच्या शिक्षणाची सोय अवश्य होईल असे आश्वासन त्यांनी दिले.