-डॉ. मेघश्री दळवी
जगाची लोकसंख्या आहे 7.7 अब्ज आणि जगात स्मार्टफोनधारक आहेत 2.7 अब्ज. म्हणजे दर तीन माणसांमागे एक स्मार्टफोन? ज्यांचा स्वत:चा फोन नाही अशी लहान मुले आणि इतर कारणाने स्मार्टफोन न खरीदणारी काही लोकसंख्या बाजूला केली, तर कदाचित दर दुसऱ्या माणसाकडे आज हा वेड लावणारा फोन आहे. त्यात प्रत्येक वर्षी दहा टक्क्यांनी भर पडेल असा अंदाज आहे. सोबत लॅपटॉप आणि टीव्ही यांचा स्क्रीन धरला, तर दर क्षणी जगात कितीजण स्क्रीनवर डोळे खिळवून असतात या आकडेवारीची कल्पना येईल!
सतत स्क्रीन पाहणे हे व्यसन होऊ शकते हे आता अनेकजण मान्य करतात. त्यात वैद्यकीय क्षेत्रातली मंडळी आली आणि तंत्रज्ञानातलीही. अनेक कंपन्यांमध्ये कामाच्या वेळात स्मार्टफोन बाजूला ठेवण्याची सक्ती केली जात आहे तर काही शाळा-कॉलेजमध्ये शिकवण्याच्या वेळेत स्मार्टफोनला पूर्ण बंदी आहे. फ्रान्समध्ये शाळेत स्मार्टफोन नेता येत नाही, तर अनेक रेस्टोरंट्स फोन दूर ठेवण्याचा आग्रह करत आहेत.
स्क्रीन-उपवास, एक दिवस/अर्धा दिवस आपणहून स्क्रीनपासून दूर राहणे असे वेगवेगळे उपाय स्क्रीनच्या व्यसनावर सुचवले जात आहेत. तर काही कंपन्या यावर तंत्रज्ञानानेच उपाय शोधत आहेत. त्यातली एक संकल्पना आहे फोन किंवा लॅपटॉप ठराविक काळासाठी आपोआप लॉक करील असे ऍप. दुसरी कल्पना आहे एका पाऊचमध्ये फोन ठेवून ती पाऊच काही वेळापुरती लॉक करणे.
ब्राझिल आणि चीनमध्ये स्मार्टफोनचे व्यसन सर्वाधिक आढळले आहे. दिवसातला सरासरी चार तासांहून अधिक वेळ या देशांमधली माणसे स्मार्टफोनच्या स्क्रीनकडे बघत काढतात. त्यात आणखी रात्री सलग नट्फ्लिक्स बघत बसणे धरले तर हे स्क्रीनचे तास किती होतील कल्पनाच करता येणार नाही. मात्र दिवसातला एकूण स्क्रीन बघण्याचे प्रमाण सरासरी दीड ते दोन तासांहून अधिक असू नये असे तज्ज्ञांचे मत आहे.
यावर आयव्हान कॅश आणि स्कॉट ब्ल्यू या तंत्रज्ञांनी एक जबरदस्त उपाय शोधून काढला आहे. आयआरएल ग्लासेस हा चश्मा. आयआरएल म्हणजे इन रिअल लाइफ. हा चश्मा लावला की समोर एखाद्या स्क्रीनवरचा प्रकाश पूर्ण ब्लॉक होतो. म्हणजेच त्या स्क्रीनवरचा कोणताही प्रोग्राम न दिसता स्क्रीन पूर्ण काळा दिसतो. यात पोलरायझेशन चतुराईने वापरून एलईडी आणि एलसीडी स्क्रीनवरचा प्रकाश ब्लॉक केलेला आहे.
हा चश्मा लावल्यावर स्मार्टफोन म्हणा, की इथे-तिथे सुरू असलेले टीव्ही, जाहिरातींचे स्क्रीन्स, सगळे काही दूर राहून तुम्ही स्क्रीनमुक्त खरं आयुष्य अनुभवाल अशी त्यामागची कल्पना आहे. हे हुशार तंत्रज्ञ आपल्या टीमसोबत त्यासाठी आता भांडवल उभारण्याचा प्रयत्न करत आहेत. हे किंवा असे आणखी उपाय येत्या काळात दिसतील यात संदेह नाही. स्मार्टफोन आणि इतर साधनांनी आपले आयुष्य सुकर केले असले तरी त्यांनी आपल्या आयुष्याचा पूर्ण ताबा घेऊ नये ही मानसिकता हळूहळू रुजत आहे. त्याला तंत्रज्ञानाची जोड मिळाली तर उत्तमच!