नवी दिल्ली -गेल्या वर्षी जागतिक बाजारात खाद्य तेलाचे दर मोठ्या प्रमाणात वाढल्यामुळे भारतीय बाजारपेठेतही खाद्य तेलाचे दर वाढले होते. मात्र आता हे दर कमी होत असल्याचा दावा सरकारने केला आहे.
केंद्रीय ग्राहक वितरण विभागाचे सचिव सुधांशु पांडे यांनी सांगितले की गेल्या काही आठवड्यांमध्ये जागतिक बाजारात खाद्य तेलाचे दर कमी होत असल्यामुळे भारतीय बाजारातही त्या प्रमाणात खाद्य तेलाचे दर कमी होऊ लागले आहेत.
खाद्यतेलाबरोबरच डाळीच्या किमतीकडे केंद्र सरकारचे बारीक लक्ष आहे. वायदे बाजारामध्ये खाद्य तेलाच्या किमती कमी होत असताना दिसून येत आहेत. त्याचा परिणाम स्पॉट मार्केटवरही होऊ लागेल.
खाद्य तेलाचे दर कमी करण्यासाठी केंद्र सरकार आयात शुल्कात कपात करणार आहे का असे विचारले असता पांडे यांनी सांगितले की सध्या तरी वायदे बाजारासह प्रत्यक्ष बाजारातील दर कमी होत आहेत. त्यामुळे सध्या तरी या शक्यतेवर विचार करण्याची गरज नाही असे त्यांनी सूचित केले.
गेल्या वर्षी लॉक डाऊन चालू असतानाच खाद्यतेलाच्या किमतीमध्ये 60 टक्क्यापर्यंत वाढ झाली होती. मात्र गेल्या काही आठवड्यांमध्ये खाद्यतेलाच्या किमतीत 15 ते 20 टक्क्यांची घट झाली आहे असा दावा त्यांनी केला.
24 मे रोजी खाद्य तेलाचे दर स्थिर रहावे यासाठी त्यांनी राज्याबरोबर चर्चा केली होती. भारत आपल्या गरजेचे 60 टक्के खाद्यतेल आयात करतो. त्यामुळे जागतिक दराचा भारतातील दरावर परिणाम होतो असे त्यांनी सांगितले.
खरिपाची पेरणी पूर्ण झाल्यानंतरच केंद्र सरकारने खाद्य तेलावरील आयात शुल्कात कपात करण्याच्या शक्यतेवर विचार करावा अन्यथा शेतकरी तेलबियांचे उत्पादन कमी करतील असे खाद्यतेल व्यापाऱ्यांच्या संघटनेने सरकारला सुचविले आहे.