जयपूर : छत्तीसगडमध्ये राष्ट्रीय तपास यंत्रणेने म्हणजेच ईडीचे धाडसत्र सुरु केले आहे. बुधवारी साकळपासून ईडीने मुख्यमंत्री भूपेश बघेल यांचे राजकीय सल्लागार विनोद वर्मा यांच्या ठिकाणांवर छापा टाकला आहे. विनोद वर्माच्या देवेंद्रनगर येथील घरावर आणि ओएसडी मनीष बंछोर, ओएसडी आशीष वर्मा आणि त्यांच्या जवळचे व्यावसायिक विजय भाटिया यांच्या घरी ईडी छापेमारी करत आहे. दरम्यान, या छापेमारीला मुख्यमंत्री बघेल यांनी बर्थडे गिफ्ट म्हणत पंतप्रधान मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यावर खोचक टीका करत ‘धन्यवाद’ म्हटले आहे.
छत्तीसगडमध्ये कथित मद्य आणि कोळसा घोटाळ्याप्रकरणी ईडी छापेमारी करत असल्याचे सांगण्यात येत आहे. याप्रकरणी ईडीने दहापेक्षा जास्त लोकांना आतापर्यंत ताब्यात घेतले आहे. कोळसा परिवहन घोटाळ्यामध्ये सीएम सचिवालयाचे अधिकारी सौम्या चौरसिया आणि रायगड जिल्हाधिकारी रानू साहू यांच्यासह अनेक अधिकारी आणि व्यायसायिकांना ईडीने अटक केली आहे. बुधवारी झालेली छापेमारी कशासंबंधात आहे हे स्पष्ट झालेले नाही.
छत्तीसगडमध्ये झालेल्या छापेमारीसंदर्भात मुख्यमंत्री बघेल यांनी ट्विटरवर आपली प्रतिक्रिया दिली आहे. जन्मदिवशी झालेली छापेमारी त्यांनी त्यांच्यासाठी गिफ्ट असल्याचे म्हटले आहे. तसेच त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना धन्यवाद म्हटले. बघेल म्हणाले, ‘आदरणीय पंतप्रधान मोदी जी आणि अमित शाह जी. माझ्या वाढदिवसादिवशी माझे राजकीय सल्लागार आणि माझे ओएसडी यांच्यासह जवळच्या लोकांवर छापेमारी करुन तुम्ही अमूल्य भेट दिली आहे. यासाठी तुमचे आभार.’
दरम्यान, भुपेश बघेल यांचा आज जन्मदिवस आहे. आजच त्यांचे राजकीय सल्लागार आणि ओएसडी यांच्या घरावर ईडीने छापा टाकला आहे. याआधी ईडीने २१ जुलै रोजी रानू साहू, त्यांचे आयपीएस पती यांच्या घरासह काँग्रेस नेता आणि अधिकाऱ्यांच्या घरावर छापेमारी केली होती. २२ जुलै रोजी ईडीने रानू साहू यांना अटक केली. त्यानंतर त्यांना विशेष न्यायाधीशांच्या कोर्टात हजर करण्यात आले. ईडीने १४ दिवसांसाठी त्यांचा ताबा मागिलता होता.