कुडाळ -जावळी तालुक्यातील भूकंपग्रस्त कात्रेवाडी ग्रामस्थांनी आपल्या विविध मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत उपोषण करण्याचा इशारा दिला आहे.
यावेळी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, अतिदुर्गम कात्रेवाडी अनेक वर्षे मूलभूत सोयी- सुविधांपासून वंचित आहे. आमचा 18 नागरी सुविधांचा प्रश्न आजही शासन दरबारी लोंबकळत पडला आहे. विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा प्रश्नही गंभीर आहे. गेली 55 वर्षे आमची फरपट सुरूच आहे. आम्हाला न्याय केव्हा मिळणार, असा प्रश्नही ग्रामस्थांनी प्रशासनाला विचारला आहे. कात्रेवाडी गाव भूकंपग्रस्त असूनही गावाला गावठाण नाही.
सामाजिक पायाभूत सुविधा मिळण्यासाठी वारंवार प्रयत्न करूनही सरकारी कार्यालयाकडून टाळाटाळ केली जाते. गावठाणसंबंधी शासन स्तरावरून आदेश देऊनही स्थानिक पातळीवर केवळ चालढकल करण्याचे काम सुरू आहे. ग्रामस्थांना भूकंपग्रस्त दाखला मिळावा, रस्ता मिळावा, गावचे गावठाण नियमित व्हावे, अशा मागण्या वारंवार करूनही सरकार आणि प्रशासन याकडे सपशेल दुर्लक्ष करत आहे.
त्यामुळे शासनाने कात्रेवाडीच्या प्रश्नांबाबत ठोस निर्णय न घेतल्यास 11 डिसेंबरपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत उपोषणाचा इशारा ग्रामस्थांनी दिला. यावेळी संदीप सावंत, पांडुरंग गोरे, प्रकाश सकपाळ, मुकेश सावंत आदी ग्रामस्थ उपस्थित होते.
रस्त्याअभावी अनेक समस्यांशी संघर्ष!
आजारी व्यक्तीला उपचारासाठी व अत्यावश्यक सेवेसाठी मुख्य रस्त्यापर्यंत आणण्यासाठी कावड- डालग्याचा वापर, पायवाटेने जाताना झाडी व मोठ्या प्रमाणावरील गवतामुळे बिबट्या, अस्वल, गवे या वन्य श्वापदांबरोबरच विषारी सर्पाची भीती, रस्ता गाठण्यासाठी एक तासाचा जीवघेणा प्रवास करावा लागत आहे.
गेल्या 66 वर्षात केवळ आश्वासनांवर आमची बोळवण केली आहे. गावचा 18 नागरी सुविधांचा प्रश्न आजही शासन दरबारी लोंबकळत पडला आहे. प्रशासन मात्र याबाबत अनभिज्ञ आहे. पिढ्यानपिढ्या खपल्या पण इथल्या माणसाला मूलभूत व पायाभूत नागरी सुविधा न दिल्यामुळे उपोषण केल्याशिवाय आता पर्याय नाही.
संदीप सावंत, भूकंपग्रस्त, कात्रेवाडी