45 मीटर रस्ता रस्ता प्रकरण : 300 मीटर अंतर कापण्यासाठी अर्धा तास
एम. डी. पाखरे
आळंदी – पुणे-आळंदी रस्त्याच्या 45 मीटर रस्ता रुंदीकरणाचे काम एका बाजुने रखडल्याने वाहनचालकांचे हाल होत आहेत. या रस्त्यावरून आळंदीत प्रवेश करण्याच्या 300 मीटरसाठी किमान अर्धा तासाचा वेळ लागत असल्याने या रस्त्याने प्रवास करणारे प्रवासी घायकुतीला आले आहेत.
तीर्थक्षेत्र आळंदीला जोडणारा एकमेव असा पुणे ते आळंदी हा प्रमुख रस्ता आहे.तो विश्रांतवाडी ते आळंदीपर्यंत 60 मीटर शासन स्तरावर मंजूर झाला आहे. पिंपरी चिंचवड महापालिका हद्द म्हणजेच काटे वस्ती (धाकटे पादुका) या ठिकाणापर्यंत 60 मीटर बीआरटीसह रस्त्याचे काम पूर्ण झाले आहे; मात्र धाकटे पादुका ते देहू फाटा या केवळ 300 मीटर अंतरावर झोपडपट्टी वसाहत असल्याने तसेच येथील स्थानिक रहिवाशांनी रस्ता व त्यासाठी लागणारी जागा शासनाला देण्यास विरोध केला आहे. त्यामुळे साठ मीटरवरून 45 मीटर रस्त्याच्या रुंदीकरण्यास मंजुरी देण्यात आली; मात्र एका बाजूने झोपडपट्टी असल्याने या रस्त्याचे काम अद्यापपर्यंत रखडलेले आहे, त्यांचे पुनर्वसन करून त्यांना पर्यायी जागा देऊन पुणे-आळंदी रस्ता 45 मीटर त्वरित खुला करण्यात यावा, अशी मागणी नागरिक करीत आहेत. या ठिकाणी संपूर्ण दिवसभर वाहतूक कोंडी होते, त्यामुळे केवळ 300 मीटरचे अंतर पार करण्यासाठी कमीत कमी अर्धा तास लागतो.
तीर्थक्षेत्र विकास आराखड्यातून देवकृपा पेट्रोल पंप (धाकटे पादुका) पर्यंत रस्ते विकसित करण्यात आले आहेत. रस्ता दुभाजकाच्या मधोमध एलईडी प्रकाशाने रस्ते प्रकाशमय केले; मात्र खाली वाहतुकीच्या रस्त्यासाठी अरुंद जागा असल्याने या परिसरात वाहने एकाच वेळी एकत्र आल्याने प्रचंड प्रमाणात वाहतूक कोंडी होते. ही कोंडी फोडता फोडता पोलिसांनाही नाकी नऊ येतात. तरी आळंदी नगरपरिषद प्रशासनाने या 45 मीटर रुंदीकरणाकडे त्वरित लक्ष घालून नगरपरिषद प्रशासन जिल्हाधिकारी यांच्याकडे पाठपुरावा करून ताबडतोब या रस्त्याचे रुंदीकरणाचे काम हाती घ्यावे, असे डॉ. राम गावडे-पाटील यांनी सांगितले.
दिवसेंदिवस आळंदीची लोकसंख्या वाढत आहे. भाविकांची संख्या देखील वाढत आहे, त्यामुळे या ठिकाणी नेहमीच वाहतूक कोंडीचा सामना सर्वांना करावा लागत आहे तसेच या मार्गावर उड्डाणपुलाची गरज असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे तसेच देहूफाटा व आळंदी शहरातील ठिकठिकाणी असणारे चौक येथेही सिग्नल बसवण्याची मागणी केली जात आहे.