पुणे : एका जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यात तसेच दुसऱ्या राज्यात जाण्यासाठी नागरिकांनी ई पास काढणे गरजेचे आहे. राज्य शासनाने अद्यापपर्यंत कोणत्यानी सुचना नव्याने दिलेल्या नसल्याने ई-पासची मुदत वाढविल्याचे पोलीस प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.
करोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने अनलॉक 3 जाहीर केले आहे. जिम, योगा केंद्र सुरू सुरू करण्यात आले असून, दुचाकीवरून दोघांना प्रवास करता येणार आहे. राज्य सरकारनेही सर्वसामान्य नागरिकांवर लावण्यात आलेले निर्बंध काही प्रमाणात शिथिल केले आहेत. मात्र, ई पास बाबत नवीन कोणत्याही सूचना अद्यापपर्यंत न आल्याने जुनी पद्धतीच सुरू राहणार असल्याचे गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त बच्चन सिंग यांनी सांगितले.
करोनाच्या पार्श्वभुमीवर नागरीकांना वेगवेगळ्या जिल्ह्यात व अन्य राज्यात जाणे सोपे व्हावे, यासाठी पोलिसांकडून डिजीटल पासची सुविधा देण्यात आली होती. लॉकडाऊन जसजसा वाढेल तसतसे डिजिटल पासची मर्यादा वाढविण्यात आली होती. संचार मनाई आदेशाचे निर्बंध काही प्रमाणात शिथिल झाल्यानंतर नागरीकांची अन्य जिल्ह्यात व राज्यात जाण्याचे प्रमाण वाढले आहे.
दरम्यान, जुलै नंतर निर्बंध आणखी शिथिल होणार असल्याचे राज्य सरकारने स्पष्ट केले. त्यामुळे प्रवासासाठी पासची गरज लागणार की नाही? असा प्रश्न नागरिकांना पडला आहे. मात्र, ई पास गरजेचा असल्याचे स्पष्ट करून बच्चन सिंग म्हणाले, नागरीकांना ऑगस्ट महिन्यांपासून प्रवासासाठी डिजिटल पास देण्याबाबत अद्याप राज्य सरकारचे स्पष्ट आदेश आलेले नाहीत. त्यामुळे पोलिसांकडुन दिल्या जाणाऱ्या डिजिटल पासची मर्यादा वाढविण्यात आली आहे.
http://www.punepolice.in यावरून नागरिकांना ई पास मिळू शकतो.