-अभय घ. टिळक
आम्हां सांपडले वर्म। करूं भागवत धर्म ।।
“पंढरीनाथाचे प्रेमभंडारी’ असे ज्या नामदेवरायांचे सार्थ वर्णन आमच्या परंपरेमध्ये केलेले आहे, ते नामदेवराय संताच्या मांदिआळींचे जीवितकार्य प्रातिनिधीकपणे या अभंगात मांडतात. भागवत धर्मविचाराचा आचार विचार प्रसृत करत राहणे हे समाजाभिमुख संतांचे जीवनकार्य होय.
नामदेवरायांचे सप्तशतकोत्तर सुवर्णमहोत्सवी जन्मसंवत्सर परवाच्या कार्तिक शुद्ध एकादशीस पूर्ण झाले. तर ज्ञानदेवांदी चारही भावंडांच्या समाधीचे सप्तशतकोत्तर रौप्यमहोत्सवी वर्ष कार्तिक वद्य चतुर्दशीपासून म्हणजेच आजपासून सुरू होते आहे.
भागवत धर्मविचाराने रूजवण केलेल्या जीवनमूल्यांचे स्मरण जागरण करण्यास याच्याइतका उचित असा कालबिंदू अन्य कोणता सापडावा? आपण म्हणूनच या स्तंभाच्या माध्यमातून त्याच भागवत धर्मविचाराच्या गाभामूल्यांचे पुनर्जागरण घडवून आणत आहोत.