सोमाटणे (ब. रा. पाटील) – मागील काही वर्षापासून वाढत्या महागाईमुळे सर्वसामान्य शेतकरी हतबल झाला आहे. वाढती मजूर टंचाई, वाढती मजूरी, रासायनिक खंतांच्या वाढत्या किंमती, इंधनाचे वाढलेले दर त्यातच निसर्गाचा नियमित लहरीपणा, शेतमालाचे पडलेले भाव आदी कारणांमुळे ग्रामीण भागातील शेतकरी पूरता मेटाकुटीला आला आहे.
जिल्ह्याच्या सर्वच ग्रामीण भागात शेतकऱ्यांसाठी शेती हाच एकमेव पर्याय असल्याने हा व्यवसाय देखील वाढती महागाई अन् निसर्गाच्या लहरीपणामुळे मोडकळीस आला आहे. एकीकडे केंद्र सरकार शेतक-यांचे उत्पन्न दुप्पट करण्याचे आश्वासन देत असताना, दुसरीकडे महागाई, वाढती मजूरी, रासायनिक खतांच्या वाढत्या किंमती, इंधन वाढ या समस्यांमुळे शेती कशी करायची? असा प्रश्न शेतकरी बांधवांना पडला आहे.
पूर्वी २०० रुपये रोजंदारीवर काम करणा-या महिला मजूरांना ३०० ते ४०० तर पुरुषाला ५०० ते ६०० रुपये प्रति दिवसाची रोजंदारी द्यावी लागते. याचे एकमेव कारण म्हणजे महागाई ठरत आहे. शेतीच्या खर्चात भरमसाट वाढ इंधनाचा खर्च, शेतात लागणारे साहित्यच नाही तर सामान्यांना कुटूंबांसाठी लागणा-या जीवनाश्यक वस्तूही महाग झाल्या आहेत. शेतकरी अक्षरशः हवालदिल झाला आहे. मजूरी, खत, बी बियाणांचे भाव गगनाला भिडले आहेत. परंतु शेतमालाला मात्र कवडीमोल भाव आहे. मग शेती करायची का आणि कशी करायची, हा प्रश्न ग्रामीण भागातील शेतकरी वर्गाला पडला आहे. अशा स्थितीत उत्पन्न दुप्पट करण्याचा लाभ शेतक- यांच्या हातात कसा पडणार, हाच मोठा न सुटणारा प्रश्न आहे.
शेतीची मशागत करण्यासाठी लागणा-या मजूरांच्या दरात वाढ झाली. एकीकडे मजूर टंचाई तर दुसरीकडे मागणी अधिक होऊ लागल्याने मजूरीत वाढ झाली. यांत्रिक शेती करताना इंधनाचे दिवसेंदिवस वाढते दर सामान्य शेतक-यांना परवडणारे नाहीत. त्यामुळे शेतक-यांची कोंडी झाली आहे. ब-याचदा शेतीची कामे ही मजूरांकरवीच करावी लागतात. मात्र मजूरीत मोठ्या प्रमाणात वाढ झाल्यामुळे शेतकरी मेटाकुटीला आला आहे. यंदा कांद्याला चांगली बाजारपेठ मिळेल, या आशेवर शेतक-यांनी कांदा पिकाची मोठ्या प्रमाणात लागवड केली. परंतू केंद्र सरकारने अचानक निर्यातबंदी केल्याने पन्नास रुपयांपर्यंत गेलेला कांदा पंधरा ते वीस रुपयांवर घसरला. यामुळे पुन्हा एकदा शेतकरी आर्थिक संकटात आला. उत्पादन खर्चही हातात पडेनासा झाला आहे. तर दुसरीकडे पीक सुरक्षा किंवा पीक विम्याबाबत सरकारी यंत्रणा अनेकदा चुकीचे सर्व्हेक्षण करते. अवकाळी पाऊस, कायम दुष्काळी स्थिती नुकसान कशामुळे जरी झाले तरी शाश्वत नुकसान भरपाई शेतक-यांना मिळत नाही. त्यामुळे शेती करावी की नाही. असा प्रश्न काही शेतकरी उपस्थित करत आहे.
आकडे बोलतात…
पुरुष मजूर ५०० ते ६००/- रू.
महिला मजूर ३०० ते ४००/- रु.
फवारणी एकरी १००० ते १२००/- रु.
एकरी बैल मशागत १२०० ते १५००/- रु.
एकरी ट्रॅक्टर मशागत १४०० ते १५००/- रु.
कोट : शेती करताना आता मजूर लावावे की नाही याचा दहा वेळा विचार करावा लागतो कारण मजुरी इतकी वाढली आहे की ती चुकविताना नाकी नऊ येतात. जेवढे उत्पादन होणार नाही त्यापेक्षा जास्त मजुरांना मजूरीच द्यावी लागते.
– सोमनाथ बोडके, गहुंजे
कोट : आता शेतीचे काम करायला आनंद वाटतो कारण रोजंदारी चांगली मिळते आहे. त्यामुळे बिगारी काम करणे आम्ही बंद केले आहे. आम्हा दोघा जणांना एकाच शेतात काम लागत असल्याने एकाचा गाडीवर जाता येते.
– शांताराम राठोड शेतमजूर