IPL 2024 (KKR vs MI Match 60) : गोलंदाजांच्या जोरावर कोलकाताने केला मुंबईचा पराभव, प्लेऑफमध्ये पोहोचणारा ठरला पहिला संघ…

IPL 2024 (KKR vs MI Match 60 Highlights) :- फिरकीपटू वरुण चक्रवर्तीच्या नेतृत्वाखालील गोलंदाजांनी केलेल्या शानदार कामगिरीच्या जोरावर कोलकाता नाईट रायडर्सने (KKR) शनिवारी (11 मे) पावसाने व्यत्यय आणलेल्या सामन्यात मुंबई इंडियन्सचा 18 धावांनी पराभव केला. या विजयासह श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखालील संघ आयपीएलच्या चालू हंगामात प्लेऑफमध्ये पोहोचणारा पहिला संघ ठरला आहे. केकेआरने मुंबईला विजयासाठी 16 षटकांत 158 धावांचे लक्ष्य ठेवले होते, मात्र मुंबई संघाला निर्धारित 16 षटकांत आठ गड्यांच्या मोबदल्यात 139 धावाच करता आल्या.
The 𝐖 that got us a 🆀! pic.twitter.com/lbCNSocazs
— KolkataKnightRiders (@KKRiders) May 11, 2024
पावसामुळे सामना दोन तास 15 मिनिटे उशिराने सुरू झाला. पावसाने सामन्यात व्यत्यय आणल्याने सामना 16-16 षटकाचा असा करण्याचा निर्णय घेण्यात आला. या सामन्यात मुंबईने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. केकेआर संघाने 16 षटकांत सात गडी गमावून 157 धावा केल्या. केकेआरसाठी व्यंकटेश अय्यरने 21 चेंडूंत सहा चौकार आणि दोन षटकारांच्या मदतीने सर्वाधिक 42 धावा केल्या. मुंबईसाठी वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह आणि अनुभवी फिरकी गोलंदाज अमित मिश्राने प्रत्येकी दोन बळी घेतले.
मुंबईने लक्ष्याचा पाठलाग करताना प्रभावी खेळाडू म्हणून आलेल्या रोहित शर्मा आणि इशान किशन या सलामीच्या जोडीने दमदार सुरुवात केली. या दोन्ही फलंदाजांनी पॉवरप्लेपर्यंत कोणतेही नुकसान न करता 62 धावा केल्या होत्या. मात्र, अनुभवी फिरकीपटू सुनील नरेनने सातव्या षटकातील पाचव्या चेंडूवर इशानला बाद करून केकेआरला पहिले यश मिळवून दिले. इशान 22 चेंडूंत पाच चौकार आणि दोन षटकारांच्या मदतीने 40 धावा करून बाद झाला.
इशान बाद झाल्यानंतर मुंबईचा डाव फसला आणि पुढच्याच षटकात वरुण चक्रवर्तीने रोहितला बाद करून मुंबईला दुसरा धक्का दिला. रोहित 24 चेंडूत 1 चौकार आणि 1 षटकाराच्या मदतीने 19 धावा करून बाद झाला. यानंतर सूर्यकुमार यादवही अपेक्षित कामगिरी करून शकला नाही आणि आंद्रे रसेलच्या चेंडूवर मोठा फटका खेळताना त्याने आपली विकेट गमावली. सूर्यकुमार यादव 14 चेंडूंत एका चौकाराच्या मदतीने 11 धावा करून बाद झाला. या धक्क्यातून मुंबईचा संघ सावरण्यापूर्वीच वरुण चक्रवर्तीने कर्णधार हार्दिक पांड्याला (02) आणि आंद्रे रसेलने खाते न उघडता टीम डेव्हिडला बाद करून मुंबईला अडचणीत आणले.
विकेटची पडझड होत असताना तिलक वर्माने हर्षित राणाच्या षटकात फटकेबाजी केली आणि तुफानी खेळी खेळली. 15 वे षटक टाकण्यासाठी आलेल्या हर्षितच्या षटकातून तिलकने 16 धावा काढल्या. तिलकने या षटकात एक षटकार आणि दोन चौकार मारले. मात्र, दुसऱ्या टोकाला धाव घेण्याच्या प्रयत्नात नेहल वढेरा धावबाद झाला. तीन चेंडूत तीन धावा करून वढेरा बाद झाला. यानंतर नमन धीर सहा चेंडूत 17 धावा करून बाद झाला. शेवटच्या षटकाच्या पहिल्या चेंडूवर हर्षित राणाने नमन धीरला बाद केले. त्यानंतर तिलक वर्माही हर्षितचे बळी ठरला. तिलक वर्मा याने 17 चेंडूत 32 धावांची खेळी केली. 158 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना मुंबईने एके काळी 5 षटकांत एकही विकेट न गमावता 59 धावा केल्या होत्या, मात्र त्यानंतर केकेआरच्या फिरकीपटूंनी धावांचा वेग रोखून नियमित अंतराने विकेट्स घेतल्या. आणि मुंबई संघाला निर्धारित 16 षटकांत आठ गड्यांच्या मोबदल्यात 139 धावाच करता आल्या. केकेआरकडून हर्षित राणा, वरुण चक्रवर्ती आणि आंद्रे रसेलने प्रत्येकी दोन बळी घेतले.
दरम्यान, केकेआरचा 12 सामन्यांमधला हा नववा विजय आहे आणि ते 18 गुणांसह गुणतालिकेत अव्वल स्थानावर आहे. कोलकातानंतर राजस्थानचा संघ आहे ज्याचे 11 सामन्यांत 16 गुण आहेत. रविवारी राजस्थानचा सामना चेन्नई सुपर किंग्जशी (CSK) होणार आहे. जर राजस्थान हा सामना जिंकण्यात यशस्वी ठरला तर प्लेऑफमध्ये पोहोचणारा KKR नंतरचा दुसरा संघ ठरेल. दुसरीकडे, मुंबईचा 13 सामन्यांमधला हा नववा पराभव असून गुणतालिकेत ते नवव्या स्थानावर आहेत. मुंबईचा संघ आधीच प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर पडला आहे.





