राजगुरूनगर -करोना काळात शेतमालाचे व्यवहार ठप्प झाले आहेत, अशातच केंद्र सरकारने कांदा निर्यातीवर बंदी आणली आहे. यामुळे शेतकरी देशोधडीला लागला आहे. ही बंदी तात्काळ उठवण्यात यावी, अशी मागणी खेड बाजार समितीचे सभापती विनायक घुमटकर यांनी केली आहे.
करोनाचे संकट सर्वांवर बेतले आहे, असे असताना जगाचा पोशिंदा असलेला शेतकरी कसाबसा शेतीमालाचे उत्पादन करून सर्वांची भूक भागवत आहे. करोनाच्या काळात कांदा बटाटासह भाजीपाला आणि फळबाग यांना भाव मिळाला नाही. सर्वाधिक उत्पादित केल्या जाणाऱ्या कांद्याला आता चांगला भाव मिळत असताना केंद्र सरकारने निर्यातबंदी केली.
यामुळे कांद्यासह शेतमाल सडून त्याचे मोठे नुकसान झाले आहे. कांदा निर्यात होऊ लागल्याने कांद्याला वाढीव दर मिळून शेतकऱ्यांना चांगले दिवस येतील, असे चित्र होते. मात्र केंद्र सरकारने त्यावर बंदी घातल्याने शेतकरी वर्गात मोठा असंतोष पसरला आहे.
कसे बनावे आत्मनिर्भर?
कांद्याला भाव मिळावा म्हणून तालुक्याचे आमदार दिलीप मोहिते पाटील यांच्या माध्यमातून उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेऊन चाकण येथे नाफेड कांदा खरेदी केंद्राला मंजुरी घेत ते सुरु करण्यात आले. त्यानंतर येथे कांद्याला 10 ते 12 रुपये भाव मिळण्यास सुरुवात झाली. यामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला होता. पुढे हा भाव वाढून दुप्पट झाला असतानाच केंद्र सरकारने कांदा निर्यात बंदी घातली आणि शेतकऱ्यांसाठी हा आत्मघातकी निर्णय घेतला. शेतकऱ्यांना आत्मनिर्भर बनविणारे केंद्र सरकारच शेतकऱ्यांच्या मुळावर उठले आहे. कांदा दरातील तेजी रोखण्यासाठी पुन्हा कुठल्याही प्रकारच्या कांद्याची आयात करू नये.