ब्रिगेडियर हेमंत महाजन यांचा विश्वास
– गायत्री वाजपेयी
पुणे – भारत-चीन युद्ध झालेच, तर चिनी सैन्याला भारतीय जवान धूळ चारतील. कारण, पूर्व लडाखच्या कमी तापमानात टिकून राहण्याचा त्यांना सराव आहे. याशिवाय त्यांना त्यासाठी खास प्रशिक्षित करण्यात आले आहे,’ असा विश्वास ब्रिगेडियर (निवृत्त) हेमंत महाजन यांनी व्यक्त केला आहे.
भारत-चीन सीमेवर वाढत्या ताणावाच्या पार्श्वभूमीवर पूर्व लडाखमध्ये लष्कर तैनात करण्यात आले आहे. येथील वातावरणात आपले सैन्य तग धरेल का? सैन्य तेथील परिस्थितीशी जुळवून घेत युद्ध लढू शकतील का? असे प्रश्न उपस्थित केले जात आहेत. याबद्दल महाजन यांनी स्पष्ट आणि सविस्तर उत्तरे दिली आहेत.
सीमेवर दोन्ही देशांनी मोठ्या प्रमाणात सैन्य तैनात केले आहे. या भागात हिवाळ्यात तग धरून राहणे भारतीय सैन्यासाठी अशक्य आहे, असा अपप्रचार चिनी माध्यमे करत आहेत. प्रत्यक्षात हिमालयीन पर्वतरांगांत कोणत्याही प्रकारच्या परिस्थितीत नुसते टिकून राहणेच नव्हे, तर युद्धस्थिती उद्भवल्यास त्यासाठी भारतीय जवान हे चिनी सैनिकांपेक्षा अधिक सक्षम आहेत.’ महाजन म्हणाले, मुख्य म्हणजे भारतीय लष्कराकडे सियाचीन हिमशिखरांचा अनुभव आहे. तेथे उणे 40 ते 50 अंश सेल्सिअस तापमानातही ते सीमांचे रक्षण करत उभे असतात. याउलट चीनचे बहुतांश सैन्य हे शहरी भागांतून
आलेले आहे.
तर बहुतांश भारतीय जवान हे आजही शेतीप्रधान, ग्रामीण भागांमधून आल्याने त्यांची शरीरयष्टी अधिक सुदृढ आहे. त्यामुळेच लडाखसारख्या ठिकाणी जिथे हिवाळ्यात तापमान उणे 30 ते 40 अंश सेल्सिअस इतके कमी असते. 40 फूट उंचीचा बर्फाचा थर जमतो आणि परिसरातील सर्व रस्ते बर्फाने बंद होतात. तेथेही लढाईसाठी भारतीय सैन्य शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या सज्ज असतात.’
लडाख सीमेवरील शस्त्रसज्जता
तोफा, लष्करी वाहने यासाठी पुरेशी इंधन साठवणूक, विविध शस्त्रांचे सुटे भाग, सैन्य आणि प्राण्यांना राहण्यासाठी सुरक्षित निवासस्थाने, बराकी, तंबू, यांची सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे. तसेच युद्धपरिस्थितीचा सामना करण्यासाठी पुरेशी छोटी शस्त्रे, क्षेपणास्त्रे, तोफा आणि आवश्यक दारूगोळादेखील सज्ज ठेवला आहे.
लडाख सीमेवर सैन्यासाठी उभारलेल्या सुविधा
अलीकडील काळात भारताने चीनशी जवळीक साधणाऱ्या सीमाभागांमध्ये अनेक महत्त्वपूर्ण पायाभूत सुविधांची उभारणी केली आहे. पूर्व लडाखकडे जोजिला आणि रोहतांग या दोन प्रदेशांतूनच जाता येत होते. भारताने दारचा ते लेह हा रस्ता बनवून आणखी एक पर्याय उपलब्ध करून दिला आहे. या मार्गाने कमी कालावधीत सैन्य हालचाल करू शकते. इतर दोन मार्गांच्या तुलनेत बर्फ, दरड कोसळणे अशा प्रकारांमुळे हा मार्ग बंद होण्याचे प्रकार कमी आहेत. त्यामुळेच सैन्याची हालचाल अथवा सैन्याला रसद पुरविणे अधिक गतिमान होते. या प्रदेशात अनेक ठिकाणी धावपट्टी, हेलिपॅड उभारण्यात आले आहेत. यामुळे हवाई वाहतुकीलाही गती मिळाली आहे. तसेच सैन्याला अत्याधुनिक हिमसंशोधन उपकरणे, बर्फ हटविण्यासाठीची उपकरणे उपलब्ध करण्यात आली आहेत.