3500 हेक्टर बाधित क्षेत्राची नोंद
बाजरी, मका, ज्वारी, सूर्यफूल, कांदा पिकांचे मोठे नुकसान
काऱ्हाटी(वार्ताहर) – सुपे (ता. बारामती) परिसरात दोन महिन्यांपासून पावसाने हाहाकार केला. मागील पाच वर्षाच्या तुलनेत यंदा 397 मिलीमीटर पाऊस पडला दोन महिन्यापूर्वी शेतकरी आभाळाकडे डोळे लावून पावसाची वाट पाहात होता तर रविवार (दि. 3) तसेच सोमवारी आणि मंगळवारी वादळी वाऱ्यासह पावसाने जोरदार हजेरी लावली व मागील पाच वर्षांचा दुष्काळ हटला तरी आता ओला दुष्काळ निर्माण झाला आहे. आतापर्यंत 75 ते 80 टक्के पंचनामे झाले आहेत. लोणीभापकर परिसरात अंदाजे 900 हेक्टर बाधित क्षेत्र तर सुपे परिसरात 3500 हेक्टर बाधित क्षेत्राची नोंद आहे.
सुपे परागण्यात चारही बाजूने पाणीच पाणी झाले असून ओढे-नाले, पाझर तलाव भरून वाहत आहेत; त्यामुळे उभ्या पिकात पाणी साचले आहे. या पावसाने फळबागांचे कळी पडणे तर बाजरी, मका, ज्वारी, सूर्यफूल, कांदा पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. पिके जमीनदोस्त झाली असून शेतकऱ्यावर हे तिसरे संकट ओढवल्याने शेतकरी पुन्हा एकदा हतबल झाला आहे.
अवकाळी पावसाने सुपे परिसरातील 5000 हेक्टर क्षेत्रावर नुकसान झाले आहे. सुपे परिसरामध्ये सुपे, लोणी भापकर, पळसी, सायंबाचीवाडी, माळवाडी, मासाळवाडी, जळकेवाडी, खामगळवाडी, जळगावकप, भिलारवाडी, अंजनगाव, कऱ्हावागज, पानसरे वाडी, काळखैरेवाडी, खंडू खैरेवाडी, चांदगुडे वाडी, दंड वाडी, मोरगाव, तरडोली, वढाणे, भोंडवे वाडी, कोळोली, नारोळी आदी परिसरात प्रत्यक्ष पाहणी करून पंचनामे करण्यास सुरुवात झाली आहे.