पावसामुळे पसरणीसह परिसरातील शेतकरी अडचणीत
वाई – परतीच्या पावसाने जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. विशेषत: या पावसाचा सर्वाधिक फटका शेतकऱ्यांना बसला आहे. वाई तालुक्यातील पसरणीसह परिसरातील सुमारे 300 हेक्टरवरील स्ट्रॉबेरीचे पावसामुळे जमीनदोस्त झाले असून स्ट्रॉबेरी उत्पादक शेतकरी अडचणीत आला आहे.
स्ट्रॉबेरीच्या शेतात गुडगाभर पाणी साठले असून रोपे अक्षरशः कुजून गेली आहेत. फळांची वाढ खुंटली आहे. पिक वाया गेल्याने शेतकऱ्यांना आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे.
वाई तालुक्यात परतीच्या पावसाने शेतकऱ्यांचे जगणे हराम करून सोडले आहे. दररोज रात्री न चुकता पाऊस हजेरी लावत असल्याने बळीराजाचा हातातोंडाच घास हिरावून घेतला गेला आहे, पसरणी गावाच्या परिसरात स्ट्रॉबिरीच्या तीनशे हेक्टर पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून शेतकऱ्यांचे लाखो रुपये पाण्यात गेले आहेत.
शेतकऱ्यांनी शेतात घातलेले बी-बियाणे, खते, मेहनत वाया गेली आहे, अतिशय महागडे पिक म्हणून याची ओळख आहे, तरीही शेतकऱ्यांनी मोठी जोखीम उचलून स्ट्रॉबिरीच्या पिकाची लागवड केली होती, परंतु अतिवृष्टीमुळे होत्याचे नव्हते झाले आहे, तरीही कृषी विभागाकडून या परिसारातील स्ट्रॉबेरीच्या पिकांचे पंचनामे करण्यात आलेले नाहीत, त्यामुळे या परिसरातील शेतकरी नासाडी झालेल्या पिकाचा पंचनामा होण्याच्या प्रतीक्षेत आहे.
ऑगस्ट महिन्यातील पावसामुळे झालेल्या नुकसानीची भरपाई आजतागायत मिळालेली नाही, त्यामुळे शेतकऱ्यांमधून संतापाची लाट उसळली असून त्वरित पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी अन्यथा बळीराजा आंदोलनाच्या पवित्र्यात आहे. दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून परतीच्या पावसामुळे वाई तालुक्यात अक्षरश: थैमान घातले आहे.
त्यामुळे स्ट्रॉबेरीबरोबरच इतर पिकांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यामुळे बळीराजा चांगलाच अडचणीत सापडला आहे. दरम्यान, शासनाने तात्काळ शेतकऱ्यांना या संकटातून सावरण्यासाठी आर्थिक मदत देणे गरजेचे आहे. सध्या कृषी विभागाने नुकसानीचे पंचनामे केले आहेत. मात्र गेल्यावेळीदेखील अशाचप्रकारे पंचनामे करण्यात आले होते. परंतु मदत काही मिळाली नाही. त्यामुळे यावेळी शासनाने पंचनाम्याची पूर्तता करुन मदत देण्याची मागणी शेतकरी वर्गातून जोर धरत आहे.
मुळात स्टॉबेरीचे उत्पादन हे पाचगणी, महाबळेश्वर परिसरात मोठ्या प्रमाणात घेतले जाते. मात्र आर्थिक उत्पन्न देणारे पिक असल्यामुळे वाई तालुक्यातही अनेकठिकाणी शेतकरी स्ट्रॉबेरीचे पिक घेऊ लागला. या पिकासाठी रोपे, औषध फवारण्या, खते यासाठी मोठ्या प्रमाणात खर्च करावा लागतो. सध्या पावसामुळे रोपे शेतातच कुजून गेली आहेत. तर अनेकठिकाणी लागवडी झालेल्या स्ट्रॉबेरीचे पावसामुळे हानी झाली आहे. फळे नासली तर काही ठिकाणी फळे आलीच नाहीत. त्यामुळे स्ट्रॉबेरी उत्पादकांचे आर्थिक बजेट पूर्णपणे कोलमडले आहे.
काही ठिकाणी तर शेतकऱ्यांनी स्ट्रॉबेरीच्या शेतीसाठी बॅंका, पतसंस्थांमधून कर्जदेखील काढले आहे. आता पिकच आले नसल्याने हे कर्ज भागवायचं तरी कसे असा प्रश्न या स्ट्रॉबेरी उत्पादक शेतकऱ्यांसमोर आ वासून उभा ठाकला असून शासनाकडे मदतीची याचना सुरु आहे.