गोंदवले – दुष्काळी माण तालुक्यात पावसाने गेल्या दोन दिवसांपासून दमदार सुरुवात केली आहे. पावसाने माण नदीसह पाणीसाठ्यांमध्ये वाढ झाली असून तालुक्यातील ढाकणी, लोधवडे व गंगोती हे तलाव पूर्ण क्षमतेने भरले आहेत. तर आंधळी तलावाने मृत पाणीसाठ्याची मर्यादा ओलांडली आहे. इतर पाच तलाव भरण्यासाठी मात्र अद्यापही मोठ्या पावसाची आवश्यकता आहे.
माण तालुक्याचे सरासरी पर्जन्यमान चारशे मिलिमीटर आहे. परंतु अलिकडच्या काही वर्षात या भागात पाऊस हुलकावणी देत असल्याने सरासरीपेक्षाही खूपच कमी पावसाची नोंद झाली आहे. गेल्या तीन वर्षापूर्वी झालेल्या पावसाने तालुक्यातील पाणीसाठे भरण्यास मदत झाली होती. मात्र हे पाणीसाठे पूर्ण क्षमतेने न भरल्याने पुढे जास्त काळ पाणी टिकवूनच वापरावे लागले. सलग तीन वर्षे पावसाने माणकडे पाठ फिरवल्याने गेल्या वर्षीपासूनच पाण्याची भीषण टंचाई सुरू झाली. पाण्याअभावी जनावरांच्या चारा व पाण्याचाही प्रश्न गंभीर होत गेला. सध्या पावसाळ्यातही तालुक्यात जनावरांच्या छावण्या व टॅंकर सुरूच आहेत.
यंदाही कोल्हापूर, सांगली, सातारा भागात महापुराने हाहाकार उडविला होता. मात्र माणमधील जनता अजूनही पावसाची प्रतिक्षाच करत होती. गेल्या दोन दिवसांपासून मात्र ही प्रतीक्षा संपून जोरदार पावसाने सुरुवात केली आहे. या पावसाने काही ठिकाणचे ओढे नाले वाहू लागले असून सुमारे दहा वर्षानंतर पावसाच्या पाण्याने माण नदी वाहती झाली आहे. तालुक्यातील पाटबंधारे विभागाच्या ढाकणी व लोधवडे तलावात यापूर्वीच उरमोडीचे पाणी आल्याने ओव्हरफ्लो झाले आहेत. गंगोती तलाव पावसाच्या पाण्याने आज भरून वाहू लागला आहे.
जांभुळणी तलावातही मृतसाठ्यापर्यंत पाणीसाठा झाला आहे. तालुक्याचा मुख्य जलस्रोत असणाऱ्या आंधळी तलावातही मोठ्या प्रमाणात पाणीसाठा होत असून आत्तापर्यंत 0.78 दशलक्षपेक्षाही अधिक पाणीसाठा झाला आहे. त्यामुळे आंधळीने मृतपाणीसाठ्याची पातळी ओलांडली आहे. मात्र वरच्या भागातून पाण्याचा प्रवाह मोठ्या प्रमाणात सुरू असल्याने व अजूनही पाऊस होण्याची चिन्हे असल्याने यंदा हा तलाव भरण्याची आशा निर्माण झाली आहे. मात्र ब्रिटिशकालीन पिंगळी व राणंदसह मासाळवाडी, महाबळेश्वरवाडी व जाशी हे तलाव अद्यापही कोरडेच आहेत. तालुक्याची पूर्ण क्षमतेने तहान भागण्यासाठी अजूनही मोठ्या पावसाची आवश्यकता आहे.