पुणे -“पुण्यातील पूरस्थितीला सत्ताधारीच जबाबदार असून, अशा गंभीर परिस्थितीतही पालकमंत्री शिवसेनेसोबत जागावाटपासाठी दिल्लीत बैठका घेत बसले आहेत, यावरूनच त्यांचे पुणेकरांविषयी प्रेम दिसून येत आहे. पूरग्रस्तांना तातडीने मदत द्यावी, जीवनावश्यक वस्तू तातडीने उपलब्ध करून द्याव्यात आणि अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर अधिकची यंत्रणा नियुक्त करावी,’ अशी मागणी कॉंग्रेसच्या शिष्टमंडळाने गुरूवारी महापालिका आयुक्तांकडे लेखी निवेदनाद्वारे केली.
या शिष्टमंडळात कॉंग्रेसचे शहराध्यक्ष रमेश बागवे, महापालिकेतील गटनेते अरविंद शिंदे, माजी आमदार मोहन जोशी यांचा समावेश होता. “घडलेली घटना दुर्देवी आहे. प्रशासनाने पूरग्रस्तांना तातडीने अत्यावश्यक साहित्याची मदत उपलब्ध करून द्यावी. स्वयंसेवी संस्थांच्या मदतीने कॉंग्रेसने पूरग्रस्तांना नाष्टा, जेवणाची व्यवस्था केली आहे. परंतू आणखी मदतीची गरज असल्याने प्रशासनाने प्रयत्न करावेत,’ असे शिंदे म्हणाले.
“हवामान खात्याने आणखी तीन दिवस अतिवृष्टीचा इशारा दिला असल्याने आपत्ती व्यवस्थापनाची अतिरिक्त यंत्रणा तैनात करावी,’ अशी मागणीही त्यांनी आयुक्तांकडे केली.
“सत्ताधाऱ्यांना निवडणुकांशिवाय पुणेकरांशी काही देणे घेणे नाही. नागरिकांचे बळी जाण्यास सत्ताधारीच कारणीभूत असून, आम्ही त्यांचा निषेध करतो,’ असे जोशी म्हणाले.