मुंबई : राज्यात पावसाने ओढ दिली असल्याने पिके धोक्यात आली आहेत. ऐन श्रावणात पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. राज्यातील अनेक प्रकल्प अजूनही कोरडे असून पावसाची चिन्हे दिसत नाहीत. त्यातच सरकारने कृत्रिम पावसाच्या प्रयोगाची चाचपणी करुन त्यासंबंधी उपाययोजना कराव्यात, अशी मागणी राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते एकनाथराव खडसे यांनी केली आहे.
एकनाथ खडसे यांनी एका निवेदनाच्या माध्यमातून ही मागणी केली आहे. या मागणीत त्यांनी ‘यंदा सुरवातीपासूनच जळगाव जिल्ह्यासह, खानदेशात व राज्यातील बहुतांश भागात चांगला पाऊस झालेला नाही. प्रारंभी राज्यातील विशिष्ट भागात झालेल्या अतिवृष्टीखेरीज नंतरच्या दिवसांत पावसाने बऱ्यापैकी ओढ दिली. पावसाच्या दिवसांत तीन आठवड्यांपेक्षा अधिक कालावधी म्हणजे, २१ दिवसांपेक्षा जास्त दिवसांचा खंड पडला आहे. त्यामुळे कशीबशी उगलेली पिके करपू लागली असून, संपूर्ण खरीप हंगामच धोक्यात आल्याचे चित्र आहे. तुरळक सरींपलिकडे पाऊस होताना दिसत नाही, असे म्हटले आहे.
त्यासोबतच खानदेशातील तीनही जिल्ह्यांमध्ये, तसेच थेट उत्तर महाराष्ट्रात नाशिकपासून विदर्भापर्यंत व मराठवाड्यातही पुरेसा पाऊस झलेला नसल्याने प्रकल्पांमध्ये पाणीसाठा झालेला नाही. अर्ध्याहून अधिक प्रकल्पांमध्ये अल्प पाणीसाठा असल्याने मोठा प्रश्न निर्माण झाला आहे.
गेल्यावर्षी सुरु झालेले टँकर अद्यापही काही जिल्ह्यांमध्ये सुरुच असून, ऑगस्ट महिना उलटला तरी टँकरच्या संख्येत व टंचाईग्रस्त गावांमध्ये वाढच होत आहे. आता पावसाचा केवळ सप्टेंबर महिना राहिला असून, परतीच्या पावसाचे वेध लागले आहेत. हवामान खात्याने सप्टेंबर महिन्यातही पुरेसा पाऊस होणार नाही, असा अंदाज वर्तविल्याने संपूर्ण राज्यात भीषण स्थिती निर्माण झाली आहे. दुष्काळाचे हे भीषण वास्तव समोर असताना सरकार मात्र त्याबाबत उदासीन आहे. या दुष्काळी स्थितीच्या पार्श्वभूमीवर राज्यात ठोस उपाययोजना होताना दिसत नाहीत. २०१५मध्ये अशीच दुष्काळी स्थिती निर्माण झाली असताना आपण महसूलमंत्री म्हणून कृत्रिम पावसाच्या प्रयोगाची चाचपणी केली होती.
त्याचा किमान पिकांसाठी उपयोग होऊ शकतो. विज्ञान- तंत्रज्ञानाने गेल्या काही वर्षांत मोठी प्रगती केली असून, त्याचा उपयोग कृत्रिम पावसाचा प्रयोग करण्यासाठी होणे गरजेचे आहे. पिके टिकविण्यासाठी कालावधी हातून निघून जात आहे. अशा वेळी कृत्रिम पावसाच्या प्रयोगाची तातडीने अंमलबजावी होणे गरजेचे आहे. याशिवाय, दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर पिण्याच्या पाण्यासह जनावरांसाठी पाणी, चारा आदींची व्यवस्था करण्यासाठी आतापासूनच नियोजन करण्याची गरज आहे. याबाबत आपण मुख्यमंत्र्यांसह दोन्ही उपमुख्यमंत्र्यांची भेट घेऊन चर्चा करणार आहोत. तसेच, विरोधी पक्षांच्या वतीने सरकारला निवेदनही देणार आहोत, असे खडसेंनी निवेदनातून नमूद केले आहे.