मुंबई – पुणे एक्स्प्रेस हायवे टोल नाक्यासंदर्भात अभिनेता किशोर कदम उर्फ सौमित्र यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत संताप व्यक्त केला आहे. मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर सर्वसामान्य माणसासह सेलिब्रिटींच्या खिशाला कात्री बसत आहे. याबाबत किशोर कदम यांनी पोस्टद्वारे सर्वांचे लक्ष वेधले आहे.
पोस्ट करत त्यांनी लिहिले की, “मुंबईहून पुण्याला जातांना एक्स्प्रेस हायवे वर 240 टोल घेतात.. मध्ये मनःशांती वगैर मध्ये काही खायला लोणावळ्यात उतरलं की वर हायवेवर पुन्हा आल्यावर पुन्हा 240 का घेतात? टोलच्या नावाखाली चाललेली लोकांची ही लूट थांबवण्या बद्दल कुणी बोललं का ? आणि एरवीही प्रवास केल्यावर अधून मधून फास्टटॅग मधून पैसे गेल्याचे मेसेजेस तासा दोन तासांनी येत राहतात ते पैसे कुठे आणि का जातात ? अरे लूट थांबवा रे ही .. लोक काहीच बोलत नाहीत म्हणून किती लुटणार आहात ? कुणाकडे तक्रार करायची? याला जबाबदार अधिकारी कोण आहेत?” असे सवाल त्यांनी उपस्थित केले आहेत.
यावर एका नेटकऱ्याने पोस्ट करत लिहिलं की, “सगळीकडे हेच चित्र आहे. मुंबईतला ऐरोली टोल नाका कशाला आहे ते कळत नाही, तिथला रस्ता किती वर्षे झाली खराबच आहे.खड्डे आणि पुढे टोल नेमकं कशाचा टोल भरायचा खड्ड्याचा का, तेच कळत नाही. रात्री दिवे नसतात तेव्हा तर आणखी वाट लागते.”
दरम्यान, किशोर कदम यांच्याआधी काही दिवसांपूर्वी अभिनेत्री ऋजुता देशमुखने देखील मुंबई-पुणे एक्सप्रेस वेसंदर्भातील पोस्ट शेअर केली होती. तसेच ‘खरचं असा नियम आहे? आणि असला तर तो बरोबर आहे का?’ असा प्रश्न तिने नितीन गडकरी यांना विचारला होता.