प्रा. सागर कुलकर्णी
दरवर्षी 12 नोव्हेंबर हा दिवस राष्ट्रीय पक्षी दिन म्हणून साजरा केला जातो. विख्यात पक्षीतज्ज्ञ आणि भारतीय पक्षीकोशाचे आद्य प्रवर्तक डॉ. सालीम अली यांचा जन्मदिन राष्ट्रीय पक्षी दिन म्हणून गेली अनेक वर्षे साजरा केला जातो आणि या निमित्ताने पक्ष्यांचा अधिवास, दुर्मिळ पक्षीप्रजातींचे जतन-संवर्धन, स्थलांतरीत पक्षी आणि त्यांची आश्रयस्थाने याविषयी जनजागृती केली जाते.
यावर्षी कोरोना व्हायरसमुळे कोविड-19 ची जीवघेणी साथ जगभर पसरली आणि सर्वत्र “लॉकडाऊन’ झाले. या लॉकडाऊनचे तोटे अनेक झाले असले, तरी निसर्गाच्या दृष्टीने हा प्रकार पथ्यावर पडला आहे. मानवाचा निसर्गातील हस्तक्षेप कमी झाला. परिणामी निसर्गाचे थांबलेले चक्र जलद गतीने फिरू लागले. साताऱ्यातील पठारावर दिसणारा भारतीय व युरोपीय नीलकंठ हा असाच एक पक्षी. यातील युरोपिअन रोलर तर हजारो मैलांचा प्रवास करून भारतात येतात. दर वर्षी आपल्या भागात माळरानावर याचे वास्तव्य असते तसेच आपल्या कडील टोळ आणि छोटे उंदीर हे यांचे खाद्य म्हणजे शेतकऱ्यांच्या अगदी फायद्याचे पण मागील काही वर्षे या पक्ष्यांच्या इकडे येण्याचे प्रमाण घटले होते; कारण त्यांच्या अधिवास संपुष्टात आला होता. पण या वेळी मात्र त्यांचे पुष्कळ प्रमाणात आगमन झाले आहे.
तसेच पेसिरीफॉरमिस कुळातील ठिपकेदार मनोली, गुलाबी मनोली, तिरंगी मनोली हे पक्षी आपल्याकडे पूर्वभारतामधून मोठ्या प्रमाणात दाखल झाले आहेत. युरोपमधील स्टेपी या भागात बर्फ पडायला लागले की, इकडे येणारे अवाढव्य स्टेपी गरुडसुद्धा साताऱ्यात मोठ्या प्रमाणात दाखल झाले आहेत. तसेच पांढूरका भोवत्या, देवससाणा हे युरोपमधून येणारे शिकारी पक्षीदेखील साताऱ्यातील गवताळ प्रदेशात दिसायला लागला आहे.
पाण्याला येणारे चमचाचोच्या, चक्रवाक, पिवळे धोबी, सैबेरियन हिवाळी गप्पीदास, असे अनेक लांबून येणाऱ्या पाहुण्यांचे आपल्याकडे या काळात जास्त प्रमाणात स्थलांतरीत झाले आहेत. तसेच यातील बरेचसे पक्षी आपल्याकडे येऊन आपल्या येथील किडी तसेच उपद्रव करणारे प्राणी यांचा समूळ नायनाट करतात. कोरोनाच्या काळात मानवी हस्तक्षेप कमी झाल्यामुळे निसर्गातील गतीविधींना नक्कीच चालना मिळाली आहे व निसर्ग पूर्वपदावर यायचा प्रयत्न करत आहे.
(लेखक सातारा येथील यशवंतराव चव्हाण इन्स्टिट्यूट ऑफ सायन्समधील प्राध्यापक आहेत.)