पिरंगुट -आगामी काळात शेती व्यवसायाला अनन्यसाधारण महत्त्व येणार असून वडिलोपार्जित राखून ठेवलेल्या जमिनी विकू नका. पुढच्या पिढ्यांसाठी सांभाळून ठेवा. मुळशीच्या मातीला ऐतिहासिक परंपरा असून शिवरायांच्या स्वराज्य निर्मितीत इथल्या मावळ्यांनी मोलाचे योगदान दिले आहे.
देशातले सर्वोत्तम शहर असलेल्या पुण्याजवळचा मुळशी हा विविध गोष्टींमुळे जगाला परिचित असलेला तालुका आहे. येणाऱ्या काळात होणाऱ्या विकासामुळे मुळशीला नवी ओळख मिळणार असल्याने जमिनी महत्त्वाच्या असणार आहेत, असे मत मुळशीचे सुपूत्र व सिनेअभिनेते प्रवीण तरडे यांनी व्यक्त केले. पिरंगुट येथील श्री शिवराय प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित रक्तदान शिबिर व श्री शिवराय पुरस्कार वितरण सोहळ्याप्रसंगी ते बोलत होते.
यानिमित्त तरडे यांच्यासह राजेंद्र ढगे, भारती गोळे (शिक्षण), प्रदीप पाटील, विजय वरखडे (पत्रकारिता), अनिल चोंधे (माजी सैनिक), भास्कर मोहोळ (कुस्ती), हभप ऋषीकेश चोरघे (कीर्तन), प्रमोद बलकवडे (आपत्ती व्यवस्थापन), सुनीता पवळे (आरोग्य), मनोज पवळे (क्रिकेट), वैष्णवी मांडेकर, सागर तांगडे (क्रीडा) यांना श्री शिवराय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. यावेळी राधिका कोंढरे, कोमल वाशिवले, कोमल साखरे, शंकर मांडेकर, बाळासाहेब चांदेरे, महादेव कोंढरे, गंगाराम मातेरे, सखाराम मारणे, विजय केदारी, विविध पक्षांचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. पुरस्कार वितरण सोहळ्याबरोबरच प्रतिष्ठानच्या वतीने रक्तदान शिबिराचे आयोजनही करण्यात आले होते, यात 262 दात्यांनी रक्तदान केले.
कार्यक्रमाचे नियोजन प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष संतोष पवळे, उपसरपंच छाया पवळे, गणेश मांडेकर, मयूर मारणे, अमित गोळे, विजय मारणे, सतीश सुतार, मोहन आवळे आदींनी केले होते. प्रास्ताविक नवनाथ चरवड यांनी, सूत्रसंचालन संतोष गावडे यांनी तर अक्षय सातपुते यांनी आभार मानले.