बेळगाव : बेळगाव सीमा प्रश्नाचा लढा तेवत ठेवणाऱ्या महाराष्ट्र एकीकरण समितीच्या नेत्यांना महाराष्ट्र-कर्नाटक सीमेवर उभे करून गोळ्या घाला, असे वादग्रस्त वक्तव्य कर्नाटक नवनिर्माण सेनेचे स्वयंघोषित अध्यक्ष भीमाशंकर पाटील यांनी केले आहे.
या वक्तव्यानंतर सीमाभागात संतप्त पडसाद उमटत आहेत. महाराष्ट्र-कर्नाटकचा सीमाप्रश्न गेल्या 60 वर्षांपासून भिजत पडला आहे. येथील मराठी भाषिक आणि महाराष्ट्र एकीकरण समितीच्या कार्यकर्त्यांनी कर्नाटच्या सार्वजनिक मालमत्तेची हानी केली.
यावर कायमस्वरुपी तोडगा काढायचा असेल तर अगोदर मराठी भाषिक आणि महाराष्ट्र एकिकरण समितीच्या नेत्यांना महाराष्ट्र-कर्नाटक सीमेवर उभं करून गोळ्या घालून विषय संपवा, असे खळबळजनक वक्तव्य भीमाशंकर पाटील यांनी केले. मराठी भाषिकांनी कर्नाटकच्या स्वाभिमानाला नेहमीच धक्का पोहचवल्याचंही त्यांनी यावेळी म्हटले.
दरम्यान, भीमाशंकर पाटील यांच्यावर तत्काळ कारवाई करावी, अन्यथा जशास तसं उत्तर देऊ, असा इशारा कोल्हापूरचे शिवसेना जिल्हाप्रमुख विजय देवणे आणि अन्य शिवसैनिकांनी दिला आहे.
गेल्याच आठवड्यात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सीमाप्रश्नी बोलताना बेळगावसह सीमाभाग पाकिस्तानात आहे का? असा प्रश्न केला होता. त्यामुळे पुन्हा एकदा महाराष्ट्र-कर्नाटकचा सीमाप्रश्न पेटण्याची शक्यता आहे.