वाहतूक शाखेची कारवाई; वीस जणांना दहा हजारांचा दंड
सातारा – अल्पवयीन मुलांना दुचाकी अथवा चारचाकी वाहने चालवायला देऊ नका, असे आवाहन अनेकदा करूनही पालक दुर्लक्ष करत असल्याने सातारा शहर पोलिसांच्या वाहतूक शाखेने बुधवारपासून शहरात मोहीम राबविली आहे. अल्पवयीन मुलांना वाहन चालवायला देणाऱ्या वीस पालकांकडून पोलिसांनी दहा हजार रुपयांचा दंड वसूल केला. संबंधित पालकांना पोलिसांनी योग्य शब्दांत समज दिली.
अल्पवयीन मुलांच्या हातात गाड्या देणे, हा गुन्हा आहे. मात्र, अशा प्रकरणात पालकांना त्रास नको, म्हणून पोलीस आतापर्यंत सामजंस्याची भूमिका घेऊन पालकांना केवळ समज देत होते. त्याचा गैरफायदा अनेक पालक घेत असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले आहे. त्यातच थर्टी फर्स्ट व नववर्ष जवळ येत असताना “एन्जॉय’च्या नावाखाली मुलांच्या हातात गाड्या देणाऱ्या पालकांविरुद्ध वाहतूक पोलिसांनी मोहीम सुरू केली आहे.
यंदा अपघात टाळण्यासाठी वाहतूक शाखेच्या कर्मचाऱ्यांनी शहरात बुधवारी सकाळपासून वाहनांची तपासणी केली. गाडी चालवणाऱ्या अल्पवयीन मुलांना थांबवून पालकांना बोलावून घेऊन किंवा फोनवरून त्यांच्या गुन्ह्याबद्दल माहिती देण्यात आली. या मोहिमेत पालकांना दंड करून समज देण्यात आली. ही मोहीम सलग तीन महिने राबविण्यात येणार असल्याचे वाहतूक शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विठ्ठल शेलार यांनी “प्रभात’शी बोलताना सांगितले.