पुणे – लॉकडाऊनमध्ये मार्केट यार्डातील घाऊक भुसार बाजाराचे कामकाज नियमित सुरू असून बाजारात अन्नधान्याची मुबलक आवक होत आहे. घाऊक बाजारात अन्नधान्याचे भाव स्थिर आहेत. दरम्यान, टाळेबंदीत वाहतुकीचा खर्च वाढल्याने किरकोळ बाजारात काही जिनसांच्या भावात अल्पशी वाढ झाली आहे.
शहराची दोन महिन्यांची गरज भागेल एवढा अन्नधान्याचा साठा भुसार बाजारात आहे. गहू, तूरडाळ, साखर, गूळ, गोटा खोबरे, हरभरा डाळीची आवक नियमित सुरू आहे. बाजारात अन्नधान्याचा अजिबात तुटवडा नाही, अशी माहिती मार्केट यार्डातील भुसार व्यापाऱ्यांची संघटना असलेल्या दी पूना मर्चंटस् चेंबरचे अध्यक्ष पोपटलाल ओस्तवाल यांनी दिली.
करोनामुळे भुसार बाजारातील कामकाजाच्या वेळेत बदल केला आहे. सध्या सकाळी 10 ते दुपारी 3 यावेळेत कामकाज सुरू आहे. भुसार बाजारात किरकोळ खरेदीदारांना प्रवेश देण्यात येत नाही. घाऊक स्वरुपात अन्नधान्याची खरेदी करणाऱ्या किराणा माल विक्रेत्यांना प्रवेश देण्यात येत आहे.
करोनाच्या संसर्गाला अटकाव घालण्यासाठी बाजार समिती तसेच भुसार बाजारातील व्यापाऱ्यांनी काही उपाययोजना केल्या आहेत. सामाजिक अंतर पाळून बाजारातील सर्व व्यवहार होत आहेत. बाजारात अनावश्यक गर्दी करू नका, असे त्यांनी सांगितले.
टाळेबंदीमुळे इतर खर्चात वाढ झाली असून वाहतुकीचा प्रश्न निर्माण झाला आहे. टेम्पोचालक उपलब्ध होत नसल्याने किराणा माल विक्रेते भुसार बाजारात खरेदीसाठी येतात. वाहतुकीचा खर्च, हमाली, तोलाई, बाजार समितीचा कर तसेच वस्तू सेवा कर आकारला जातो. त्यामुळे किरकोळ बाजारात अन्नधान्याच्या किमतीत अल्पशी वाढ झाली आहे.
– पोपटलाल ओस्तवाल, अध्यक्ष, दी पूना मर्चंटस् चेंबर