पुणे – करोनाच्या प्रादुर्भावानंतर ग्रामीण भागातील कृषी अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी आणि शेतकऱ्यांच्या फायद्यासाठी प्रशासनाकडून पावले उचलली जात आहेत. पुणे जिल्ह्याच्या दुर्गम भागातील शेतकऱ्यांना शेतीसाठी लागणारी वाहने, यंत्रांसाठी घरपोच डिझेल पुरविण्यासाठी सेवा सुरू करण्यात आली आहे. जिल्हा परिषदेच्या पुढाकाराने पहिल्या टप्प्यात मावळ, मुळशी, भोर, वेल्हा आणि खेड तालुक्यांसह जिल्ह्याच्या दुर्गम भागात ही सेवा राबविण्यात येणार आहे, अशी माहिती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांनी दिली.
ग्रामीण अर्थव्यवस्थेला बळकटी देण्यासाठी जिल्ह्यात शेतीसाठी इंधन देण्याचा निर्णय घेण्यात आला. मात्र, यासाठी वाहन पंपावर घेऊन जावे लागत होते. दुर्गम भागात हे पंप दूर अंतरावर असल्याने इंधनासाठी अधिक वेळ लागत होता. त्यासाठी इंधनाचा अपव्यय होत होता.
परिणामी दुर्गम भागात शेतकऱ्यांना अडचणींना तोंड द्यावे लागत होते. या पार्श्वभूमीवर मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांनी कृषी क्षेत्रात डिझेल वाहतूक वाहनांद्वारे घरोघरी जाऊन डिझेल वितरणाची परवानगी दिली. रेपॉस एनर्जी या संस्थेमार्फत या सेवेला सुरुवात करण्यात आली आहे.