पिंपरी (संदीप घिसे) – एक काळ असाही होता जेव्हा कोणत्या गणपती मंडळाने मिरवणुकीसाठी कोणता बॅण्ड आणलाय, त्यावर मंडळाची कुवत ठरत होती. गणेश आगमन आणि विसर्जन मिरवणुकीला बॅण्ड वाजल्याशिवाय उत्सव साजरा झाल्यासारखे वाटायचं नाही. पण काळ बदलला आणि डॉल्बीच्या दणदणाटाने बॅंजो, बॅण्डचा आवाज दाबून टाकला. त्यानंतर उरलासुरला आवाज करोनाच्या लॉकडाऊनं संपवला. आज बड्या बड्या बॅण्ड पथकांनी गाशा गुंडाळला आहे आणि जे काही सुरू आहेत ते देखील कर्जबाजारी झाले आहेत.
बॅण्डच्या तालावर मागच्या पिढ्यांनी गणेशोत्सव, दहीहंडी, नवरात्री उत्सव साजरे केले. बॅण्डच्या तालावरच गावागावात देवाच्या मिरवणुका निघाल्या. नेत्यांच्या स्वागतालाही बॅण्डच लागत होता. बॅण्डशिवाय एकही उत्सव पार पडत नव्हता आणि बॅण्डशिवाय उत्साहही संचारत नव्हता. बॅण्ड म्हणजे शान, श्रीमंती आणि रुबाब दाखवायचं साधन होतं. लाल, पिवळे गणवेश धारण केलेले वादक, तोंड फुगवून फुटेस्तोवर वाजवली जाणारी वाद्ये, गायिकेचा आवाज काढणारे गायक, ढोलकीपटू, गॅसबत्त्या घेऊन चालणाऱ्या महिला, कधी कधी तर रात्रभर मिरवणूक चालायची. बॅण्ड वाजायला लागला की तरूण कार्यकर्ते डोलायला लागायचे.
काळ बदलला आणि उत्सवाचे स्वरुप बदलले. डॉल्बी आली आणि बॅण्ड कोपन्यात जाऊन बसला. लॉकडाऊनने व्यवसाय ठप्प झाला. एका बॅण्डच्या जीवावर जगणारे 20-22 संसार रस्त्यावर आले. गेल्या अनेक वर्षांपासून रडतखडत चाललेल्या या व्यवसायाला लॉकडाऊनंतर अखेरची घरघर लागली. जिथे वर्षाला 80-90 सुपाऱ्या यायच्या तिथे आता 30-40 सुध्दा कशाबशा येतात. गणवेश वर्षाला बदलायला लागतो. एका बॅण्डला 20-25 लाखाचे भांडवल लागते. त्यासाठी कर्ज आहेत. जुनी वादक मंडळी मिळत नाहीत आणि नवी पिढी तर आता या व्यवसायात येतच नाही. रुपयातील चार आणे धंदा राहिलाय, असे बॅण्ड व्यावसायिक सांगितात.
कलाट, ट्रॉपेट, एपोनेम, सेक्सोफोन, ढोल, ताशे, सनई चौघडा, पेटी हे सारे आता अडगळीत पडून आहे. कर्जाच्या हप्त्यांनी व्यावसायिकांच्या संसाराचा बॅण्ड वाजायची वेळ आली आहे. शासनाने काहीतरी मदत करावी, अशी मागणी सारेच बॅण्डवाले करीत आहेत.
बॅण्ड गेला रथ आला
बॅण्डवाल्यांनी आता रथ तयार केले आहेत. डोली तयार करीत आहेत. लग्नाची वरात, देवाच्या मिरवणुकीसाठी हे रथ भाड्याने दिले जातात. पण तो तयार करायलाही 5-6 लाखापर्यंत खर्च येतो. गणपतीला 14 हजार तर लग्नाला 8 हजार रुपये भाडे घेतात. बॅण्डलाही एका दिवसाला 30-40 हजार तर दोन दिवसाला 50 हजार भाडे घेतले जाते.
गेले ‘ते’ दिवस
पिंपरी चिंचवड शहरात एके काळी जबरदस्त बॅण्ड पथके होती. त्यापैकी काही बॅण्ड शहरातच नव्हे तर राज्यातही प्रसिद्ध होते. यातले बरेच आता बंद पडले. त्यामुळे “गेले ते दिवस, राहत्या त्या आठवणी’, असे बॅण्ड वादक खेदाने सांगत आहेत.