चिखली, म्हेत्रेवस्ती : कामगारांना मोफत धन्वंतरी, जेवणाची सोय
पिंपरी – करोनामुळे अनेक गोरगरीब, मजूर आज रस्त्यावर आले आहेत. त्यांच्या राहण्या, खाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. या महामारीने त्यांचे सर्वस्व हिरावून घेतले आहे. अशा व्यक्तींसाठी चिखली, म्हेत्रेवस्ती येथील एक डॉक्टर देवासारखे धावून आले आहेत. त्यांनी गरजू, गरीब व मजूर नागरिकांसाठी मोफत औषधोपचार व अन्नदान सुरू केले आहे.
म्हेत्रेवस्ती, चिखली परिसरात मोठ्या प्रमाणावर कामगार वर्ग राहत आहे. करोनामुळे सर्व उद्योग, घरगुती कामे, कंपन्या बंद ठेवण्यात आल्या आहेत. त्यामुळे परराज्यातून, बाहेरच्या जिल्ह्यांतून आलेल्या अनेक कामगारांपुढे जगावे कसा हा प्रश्न निर्माण झाला आहे. करोनामुळे सर्व नागरिक घरी आहेत. परंतु अनोळखी व्यक्तींना कोणीही मदत करण्याच्या भानगडीत पडत नाही. त्यामुळे असे गोरगरीब, मजूर नागरिक पोटाची खळगी भरण्यासाठी चिंतेत आहेत. आजारी पडले तर दवाखान्यात जाण्यासाठी औषधोपचार करण्यासाठी पैसे नाहीत. त्यामुळे जगावे कसे हा प्रश्न येथील कामगनगरीतील अनेकांपुढे निर्माण झाला आहे.
महाराष्ट्रात सर्वात प्रथम करोनाबाधित असणाऱ्या रुग्णांची संख्या पिंपरी-चिंचवड शहरात जास्त होती. परंतु पिंपरी चिंचवड महापालिका प्रशानाने, डॉक्टर, नर्स, वॉर्डबॉय यांनी आहोरात्र प्रयत्न केले. परंतु सर्वांनाच अशी सेवा करण्याचे भाग्य प्राप्त होत नाही. त्यामुळे चिखली, म्हेत्रेवस्ती येथील एका रुग्णालयातील डॉ. जितेंद्रसिंग राठोड यांनी ज्यांची हातावर पोटे आहेत. ज्यांना रोज कामावर गेल्याशिवाय आपल्या पोटाची भूक भागवने शक्य नाही. अशा गरजू, गरीब व मजूर नागरिकांच्या आरोग्याची तपासणी करून त्यांना मोफत औषधोपचार व जेवणाची सोय केली आहे.
उपासमार होत असल्याने कामगार आपल्या मूळ गावी जाण्याच्या तयारीत होते. अशा नागरिकांसाठी डॉ. राठोड यांनी पहिल्या दिवशी दोनशे जणांसाठी जेवणाची सोय केली. ते जेवण संपल्याने डॉ. राठोड यांनी दररोज सकाळी दहा ते रात्री दहा या वेळेत जेवणाची सोय केली आहे. याचा परिसरातील गरीब, गरजू व कामगार नागरिक लाभ घेत आहेत. साधारण हजार नागरिकांना येथे अन्नदान केले जाते. तसेच ज्यांची प्रकृती ठीक नाही त्यांना मोफत औषधोपचार केले जात आहेत. त्यासाठी डॉ. राठोड यांनी चोवीस तास आपली ओपीडी सुरू ठेवली आहे.
करोना विषाणूजन्य आजारामुळे संपूर्ण देश संकटात सापडला आहे. त्यामुळे कामगारांची मोठ्या प्रमाणावर अडचण निर्माण झाली आहे. त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. त्यांना धीर देण्यासाठी ही योजना सुरू केली आहे. रुग्णालयातून मिळणारा पैसा यासाठी खर्च केला जात आहे. रुग्णालयाच्या माध्यमातून साधारण दिवसाला दोन हजार नागरिकांना जेवण देण्याची तयारी करण्यात आली आहे.
– डॉ. जितेंद्रसिंग राठोड, म्हेत्रेवस्ती, चिखली