मुंबई: ईव्हीएम व व्हीव्हीपॅटच्या स्ट्राँगरुम मध्ये उमेदवारांना प्रवेश देण्यात येऊ नये, अशी मागणी करत प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी याबाबत मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांकडे लेखी पत्रव्यवहार केला आहे. महाराष्ट्रातील मतदानाच्या सर्व टप्प्यांमध्ये यशस्वी नियोजन व अंमलबजावणीबद्दल निवडणूक आयोगाचे जयंत पाटील यांनी अभिनंदनही केले.
आयोगाच्या या यशस्वी कार्याला एका निर्णयाने गालबोट लागले असे दुर्दैवाने नमुद करावेसे वाटते, असे सांगतानाच लोकसभेच्या निवडणुका लढविलेल्या उमेदवारांना या सीलबंद मशिन्स व व्हीव्हीपॅट ठेवलेल्या स्ट्राँगरुम मध्ये थेट आतमध्ये जाण्यासंबंधी दिल्या गेलेल्या परवानगीच्या निर्णयाबाबत आमचा आक्षेप असून याचा निषेध करत असल्याचेही पाटील म्हणाले. यावर तातडीने पुनर्विचार करुन उमेदवारांना या स्ट्राँगरुम मध्ये जाण्यास दिलेली परवानगी रद्द करावी अशी मागणीही त्यांनी केली.
तसेच, सत्ताधारी पक्षाचे उमेदवार तांत्रिक करामतीचा अवलंब करुन दुरुस्त पद्धतीने या ईव्हीएममध्ये नोंदवल्या गेलेल्या निकालामध्ये बदल करु शकतील, अशी भीतीही पाटील यांनी व्यक्त केली आहे.