…तर मान्यताही रद्द : अ.भा. तंत्रशिक्षण परिषदेचे शिक्षण संस्थांना आदेश
पुणे – इंजिनिअरिंग, एमबीए , एमसीए, आर्किटेक्चर, फार्मसी, हॉटेल मॅनेजमेंटसह व्यावसायिक अभ्यासक्रमाचे शिक्षण घेणाऱ्या लाखो विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. जोपर्यंत लॉकडाउन संपत नाही, तोपर्यंत विद्यार्थ्यांकडून कोणत्याही शैक्षणिक संस्थेने फी आकारू नये, असे स्पष्ट
निर्देश केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयांतर्गत काम करत असलेली अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदेने (एआयसीटीई) दिले आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.
याबाबत एआयसीटीईने सर्व महाविद्यालयांना पत्र लिहिले आहे. लॉकडाउन जोपर्यंत पूर्ण होत नाही आणि परिस्थिती सामान्य होत नाही, तोपर्यंत विद्यार्थ्यांकडे फी विचारणा करण्यात येऊ नये. तसेच विद्यार्थांकडून फी केव्हा आकारायची याबद्दल पुन्हा मार्गदर्शक सूचना देण्यात येईल, असे म्हटले आहे.
लॉकडाऊनदरम्यान कोणताही शिक्षक किंवा शिक्षकेतर कर्मचाऱ्याची नोकरीला जाणार नाही. एखाद्या संस्थेने असे केले असल्यास त्यांना त्वरित पुन्हा घ्यावे लागेल. आणि त्या कालावधीचे वेतन ही द्यावे लागेल, असे एआयसीटीईने स्पष्ट केले आहे. विद्यार्थी व शिक्षकांनी एआयसीटीईकडे तक्रार पाठविली होती की, विद्यार्थांना फी भरण्यास भाग पाडले जात असल्याचे सांगण्यात आले होते. याशिवाय संस्थांमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्याला नोकरीवरुन काढून टाकल्याची आणि पगार न दिल्याची तक्रार केली होती. या तक्रारी गंभीरपणे दखल घेण्यात आलेली आहे.
एआयसीटीईच्या पत्राद्वारे स्पष्ट सूचना करण्यात आली आहे की, टेक्निकल महाविद्यालयाने नियमांचे उल्लंघन केले तर त्याविरूद्ध कठोर कारवाई केली जाईल, ज्यामध्ये इतर गोष्टींबरोबरच मान्यता देखील रद्द केली जाऊ शकते.