नवी दिल्ली : देशात दुसऱ्यांदा 3 मे पर्यंत लॉकडाऊनची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली आहे. 24 मार्चपासून 14 एप्रिलपर्यंतच्या पहिल्या लॉकडाऊनमध्ये अत्यावश्यक सेवा वगळता सर्वकाही बंद ठेवण्यात आले होते. यामध्ये देशभरातील टोल देखील बंद केले होते. मात्र आता राष्ट्रीय महामार्गावरील सर्व टोलनाक्यांवर 20 एप्रिलपासून टोल वसुली चालू होणार आहे. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून याबाबतचे आदेश जारी करण्यात आले आहेत.
17 एप्रिल रोजी प्राधिकरणाने हे आदेश जारी केले असून या आदेशानुसार आता देशभरातील टोलनाक्यांवर खासगी तसेच व्यावसायिक वाहनांकडून टोलवसुली सुरु करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. राष्ट्रीय महामार्गावरीलसर्व टोलनाक्यांवर 20 एप्रिलपासून टोल वसूली सुरु झाल्यानंतर महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाकडून देखील राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या पावलावर पाऊल टाकत राज्यातल्या टोलवर वसुली सुरु केली जाण्याची शक्यता आहे.
कोरोना विषाणु आणि देशभरात लागु करण्यात आलेल्या लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर देशातील अनेक सेवा बंद केल्या आहेत. मात्र देशभरात कोरोना हॉटस्पॉट नसलेल्या ठिकाणी 20 एप्रिलपासून सवलत मिळण्याची शक्यता आहे. राज्यातील तसेच देशातील काही भागांमध्ये अटी शर्तींच्या अधीन राहून काही उद्योगधंद्यांना काम सुरु करण्याची परवानगी मिळण्याची शक्यता आहे.