सातारा – जिल्हा मध्यवर्ती बॅंकेला 2021- 22 या आर्थिक वर्षाअखेर 138 कोटी 17 लाख रुपयांचा करोत्तर नफा झाला आहे. बॅंकेचा निव्वळ नफा 67 कोटी रुपये असून राखीव निधीसाठी 20 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे, अशी माहिती जिल्हा बॅंकेचे अध्यक्ष नितीन पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी बॅंकेचे उपाध्यक्ष अनिल देसाई, मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र सरकाळे, संचालक शिवेंद्रसिंहराजे भोसले, दत्तानाना ढमाळ इत्यादी उपस्थित होते.
नितीन पाटील म्हणाले, “यंदाच्या आर्थिक वर्षामध्ये बॅंकेने 163 कोटी 70 लाख रुपयांचा करपूर्व नफा मिळवला. यामध्ये 25 कोटी 52 लाख रुपयांचा प्राप्तीकर भरला आहे. म्हणजे करोत्तर नफा 138 कोटी 17 लाख रुपये इतका झाला आहे. बॅंकेकडे 9122 कोटी तीन लाख रुपयांच्या ठेवी असून पाच हजार 112 कोटी रुपयांची कर्जे आहेत. बॅंकेचा संमिश्र व्यवसाय 14234 कोटी 84 लाख रुपये झाला आहे. बॅंकेच्या स्वनिधीमध्ये 69 कोटी रुपये इतकी भरीव वाढ झाली असून बॅंकेचा एकूण स्वनिधी 739 कोटी आहे.
रिझर्व्ह बॅंकेच्या सूचनेप्रमाणे जिल्हा बॅंकेने सरकारी कर्जरोखे आणि बॅंकांमध्ये पाच हजार 194 कोटी रुपये 32 लाख इतकी सुरक्षित गुंतवणूक केली आहे. बॅंकेची अनुत्पादक कर्जे दहा कोटी 4 लाख रुपये असून एकूण कर्जाचे हे प्रमाण 0.20 टक्के इतके आहे. शेतकऱ्यांसाठी एक ते तीन लाख रुपये पर्यंतच्या पीककर्जाला दोन टक्के, अल्पमुदतीच्या तीन लाखांवरील सोसायटी कर्जदारांना अडीच टक्के, शेतकरी सभासदांच्या पाल्यांच्या उच्चशिक्षणासाठी शून्य टक्के व्याजदर देण्यात आला आहे.