वडगावशेरी – खराडी, वडगावशेरी आणि चंदननगरचा महापालिकेत समावेश झाल्याने या भागात स्वतंत्र अग्निशमन केंद्र उभारण्याचा निर्णय तत्कालीन अग्निशमन प्रमुख प्रशांत रणपिसे यांनी घेतला होता. यासाठी त्यांनी जागाही ताब्यात घेतली होती. याशिवाय त्याठिकाणी बांधकमही करण्यात आले होते. मात्र, भवन विभाग आणि अग्निशमन विभाग यांच्यातील वादामुळे ही इमारत अग्निशमन विभागाला अद्यापही ताब्यात मिळू शकलेली नाही. स्वतंत्र अग्निशमन केंद्राचे नियोजन अद्याप कागदावरच असून महापालिका प्रशासनाच्या अशा कारभाराचा फटका सामान्य नागरिकांना बसण्याचा धोका आहे. उन्हाळ्याचे दिवस लक्षात घेता महापालिका प्रशासकांनी येथील अग्निशमन केंद्राबाबत तातडीने निर्णय घ्यावा, अशी मागणी होत आहे.
“त्या’ कंपन्यांचे करायचे काय?
खराडी आणि वडगावशेरी भागात अनेक आयटी कंपन्या आहेत. या कंपन्या पालिकेला कर भरतात, त्यांना सुरक्षा पुरविणे ही महापालिकेची जबाबदारी आहे. मात्र, प्रशासनाला याचे गांभीर्य दिसत नाही. त्यामुळे या कंपन्यात एखादी आपत्कालीन घटना घडल्यास मदत पोहोचली नाही तर याला जबाबदार कोण? असा प्रश्न उपस्थित होत आहे.
कारभार असाच चालणार का?
जकात नाक्यांवरील एका हॉटेलला आग लागली होती. या आगीत हॉटेल भस्मसात झाले. ही आग आटोक्यात आणण्यासाठी शहरातील अग्निशमन दलाला चार तास लागले, त्यातूनच मोठी दुर्घटना होण्याची शक्यता होती. त्यामुळे प्रशासनाने स्थानिक ठिकाणेच अग्निशमन केंद्र तातडीने सुरू करणे गरजेचे ठरत आहे.
खराडी, वडगावशेरी आणि चंदननगर परिसरासाठीच्या स्वतंत्र अग्निशमन केंद्रासाठीची जागा ताब्यात घेण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. ही जागा ताब्यात मिळाल्यास त्याठिकाणी तातडीने केंद्र सुरू करण्याचे आमचे प्रयत्न आहेत. याबाबतही महापालिका प्रशासनाकडे पाठपुरावा करीत आहोत, लवकरच हे काम पूर्ण होईल.
– सुनील गिलबिले, प्रभारी प्रमुख अग्निशमन दल, मनपा
अग्निशमन केंद्र सुरू होण्यासाठी आम्ही आतापर्यंत बरेच प्रयत्न केले आहेत. मात्र, प्रशासनाकून अपेक्षित सहकार्य मिळत नाही. त्यामुळे यापुढील काळात प्रशासनाला आंदोलनाच्या माध्यमातून धडा शिकवावा लागणार आहे. येत्या पंधरा दिवसात हा प्रश्न मार्गी लागला नाही तर आंदोलनाची तयारी करण्यात येईल.
– हेमंत बट्टे, उपाध्यक्ष, मनसे पुणे शहर